अधिकार लोकांनी दिला पाहिजे

ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे आणि इतर वर्ण हीन आहेत, असे म्हणून ब्राह्मण जातीचे पुढारी स्वस्थ बसत नसत. ते चारही वर्णाची कर्तव्याकर्तव्ये कोणती हे सांगण्याचा अधिकार आपणाकडे घेत, असे मज्झिमनिकायातील (नं. ९६) एसुकारिसुत्तावरून दिसून येते. त्यातील मजकुराचा सारांश असा :--

एके समयी बुद्ध भगवान श्रावस्ती येथे जेतवनात अनाथपिंडिकाच्या आरामात राहत होत. त्या वेळी एसुकारी नावाचा ब्राह्मण त्याजपाशी आला, आणि कुशलसमाचारादिक विचारून एका बाजूला बसला व म्हणाला, “भो गोतम, ब्राह्मण चार परिचर्या (सेवा) सांगतात. ब्राह्मणाची परिचर्या चारही वर्णांना करता येते. क्षत्रियांची परिचर्या क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या तीन वर्णांनी करावी, वैश्याची परिचर्या वैश्य आणि शुद्र यांनीच करावी आणि शुद्राची परिचर्या शुद्रानेच करावी, इतर वर्णांना मनुष्य त्याची परिचर्या कशी करील?  परिचर्यासंबंधाने आपले म्हणणे काय आहे?”

भ.—हे ब्राह्मणा, या ब्राह्मणाच्या म्हणण्याला सर्व लोकांची संमति आहे काय? अशा परिचर्या सांगण्याला लोकांनी त्यांना अधिकार दिला आहे काय?

एसु.—भो गोतम, असे नाही.

भ.—तर मग, एखाद्या मांस खाऊ न इच्छिणार्‍या गरीब माणसावर त्याचे शेजारी मासाचा वाटा लादतील आणि म्हणतील की, हे मांस तू खा आणि याची किंमत दे! त्याचप्रमाणे लोकांवर ब्राह्मण ह्या परिचर्या लादीत आहेत असे म्हणावे लागते. माझे म्हणणे असे की, कोणत्याही वर्णाचा मनुष्य असो, त्याची परिचर्या केल्याने कल्याण होते, अकल्याण होत नाही. त्याचीच परिचर्या करणे योग्य आहे. चारी वर्णाच्या समजंस माणसांना विचारले असता ते देखील असेच मत देतील. उच्च कुलात, उच्च वर्णात किंवा श्रीमंत घराण्यात जन्म घेणे चांगले किंवा वाईट असे मी म्हणत नाही. उच्च कुलात, उच्च वर्णात किंवा श्रीमंत घराण्यात जन्मलेला मनुष्य जर प्राणघातादिक पापे करू लागला तर त्याची कुलीनता चांगली नव्हे, पण तो प्राणघातादिक पापापासून विरत झला तर त्याची कुलीनता वाईट नव्हे. ज्या माणसाची परिचर्या केली असता, श्रद्धा, शील, श्रुत, त्याग आणि प्रज्ञा यांची अभिवृद्धि होते, त्याची परिचर्या करावी असे मी म्हणतो.

एसु.—भो गोतम, ब्राह्मण ही चार धने प्रतिपादितात. भिक्षाचर्या ब्राह्मणाचे स्वकीय धन होय, बाणभाता हे क्षत्रियांचे शेती आणि गोरक्षा हे वैश्याचे आणि कोयता व टोपली हे शुद्राचे चारही वर्णानी आपापल्या स्वकीय धनाची हेळसांड केली तर ते चोरी करणार्‍या राखणदाराप्रमाणे अकृत्यकारी होतात, यासंबंधी आपले म्हणणे काय आहे?

भ.—हे ब्राह्मणा, ही चार धने सांगण्याला ब्राह्मणाला लोकांनी अधिकार दिला आहे काय?

एसु.—नाही, भो गोतम.

भ.—तर मग मांस न खाऊ इच्छिणार्‍या गरीब माणसावर मांसाचा वाटा लादून त्याची किंमत मागण्यासारखे हे ब्राह्मणाचे कृत्य समजले पाहिजे. हे ब्राह्मणा, श्रेष्ठ आर्य घर्म हेच सर्वांचे स्वकीय धन आहे, असे मी म्हणतो. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शुद्र या चार कुळांत जन्मलेल्या माणसांना अनुक्रमे क्षत्रिय, वैश्य शुद्र म्हणतात ज्याप्रमाणे लाकूड, शकलिका, गवत आणि गोवर्‍या या चार पदार्थांपासून उत्पन्न झालेल्या अग्नीला अनुक्रमे काप्ठाग्नि, शकलिकाग्नि, तृणाग्नि आणि गोमयाग्नि म्हणतात. त्याप्रमाणे ह्या चार संज्ञा आहेत. परंतु ह्या चारी कुलातील मनुष्य प्राणघातादिक पापापासून निवृत्त झाले, तर त्यापैकी ब्राह्मण तेवढाच मैत्रीभावना करू शकेल व इतरवर्णी लोक मैत्रीभावना करू शकणार नाहीत, असे तुला वाटते काय?

एसु.—भो गोतम, असे नव्हे. कोणत्याही वर्णाचा मनुष्य मैत्रीभावना करू शकेल.

भ.—ब्राह्मणच तेवढा नदीवर जाऊन स्नानचूर्णाने आपले अंग साफ करू शकेल, पण इतर वर्णाचेच लोक आपले अंग साफ करू शकणार नाहीत. असे तुला वाटते काय?

एसु.—भो गोतम, असे नव्हे. चारही वर्णाचे लोक नदीवर जाऊन स्नानचूर्णाने आपले अंग साफ करू शकतील.

भ.—त्याचप्रमाणे हे ब्राह्मणा, सर्व कुलातील लोक तथागताच्या उपदेशाप्रमाणे वागू न्याय्य धर्माची आराधना करू शकतील.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel