यश—कारण ते ह्या डोक्याचा कंटाळा करतात.

अ.—याच माणसाच्या डोक्याचा कंटाळा करतात की सर्वच माणसच्या डोक्याचा कंटाळा करतात.

अ.—माझ्या डोक्याचा देखील कंटाळा करतील काय?

या प्रश्नाचे उत्तर देण्यास यश धजेना. पण अशोकाने अभयदान दिल्यावर तो म्हणाला, “महाराज, आपल्या डोक्यालाही लोक असेच कंटाळतील.”

अ.—तर मग मी असे डोके भिक्षूंच्या पायावर ठेवून त्याचा बहुमान केला, तर तुला वाईट का वाटावे?

या संवादानंतर काही श्लोक आहेत त्यापैकी हा एक—

आवाहकालेय विवाहकाले
जाते: परीक्षा न तु धर्मकाले।
धर्मर्पयाया हि गुणा निमित्ता
गुणाश्च जाति न विचारयन्ति।।

‘मुलाच्या आणि मुलीच्या लग्नात* जातीचा विचार करणे योग्य आहे. धार्मिक बाबतीत जातीचा विचार करण्याचे कारण नाही का
की, धार्मिक कृत्यांत गुण पाहावे लागतात आणि गुण जातीवर अवलंबून नसतात.”
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*आवाह म्हणजे सुनेला घरी आणणे आणि विवाह म्हणजे आपल्या मुलीचे लग्न करून सासरी पाठविणे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जैन संघाने जातिभेद स्वीकारला

इतर श्रमणसंघापैकी एक तेवढ्या निर्ग्रन्थ संघाची अल्पस्वल्प महिती आजला उपलब्ध आहे. ह्या श्रमणसंघाने जातिभेदाला अशोकापूर्वीच महत्त्व देण्याला सुरुवात केली, असे आचारांगसूत्राच्या निरुक्तीवरून दिसून येते. ही निरुक्ति भद्रबाहुने रचली आणि तो चंद्रगुप्ताचा गुरू होता अशी समजूत जैन लोकांत प्रचलित आहे. ह्या निरुक्तीच्या आरंभीच जातिभेदाविषयी जो मजकूर सापडतो, त्याचा सारांश असा— ‘चार वर्गाच्या संयोगाने  सोळा वर्ण उत्पन्न झाले. ब्राह्मण पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून प्रधान क्षत्रिय किंवा संकर क्षत्रिय उत्पन्न होतो. क्षत्रिय पुरुष आणि वैश्य स्त्री यांजपासून प्रधान वैश्य किंवा संकर वैश्य उत्पन्न होतो. वैश्य पुरुष व शुद्र स्त्री यांजपासून प्रधान शुद्र किंवा संकर शुद्र उत्पन्न होतो. ह्याप्रमाणे सात वर्ण होतात. आता ही नववर्णान्तरे—

(१) ब्राह्मण पुरुष व वैश्य स्त्री याजपासून अम्बष्ट, (२) क्षत्रिय पुरुष आणि शुद्र स्त्री यंजपासून उग्र, (३) ब्राह्मण पुरुष आणि शुद्र स्त्री याजपासून निषाद, (४) शुद्र पुरुष आणि वैश्य स्त्री यांजपासून अयोगन, (५) वैश्य पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून मागध, (६) क्षत्रिय पुरुष व ब्राह्मण स्त्री यांजपासून सूत, (७) शुद्र पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून क्षत्ता, (८) वैश्य पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांजपासून वैदेह. (९) शुद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांजपासून चांडाळ उत्पन्न होतो.
(आचारंग निर्युक्ति अ. १ गाथा २१ ते २७)

आजला अस्तित्वात असलेली मनुस्मृति ह्या निर्युक्तीपेक्षा फारच अर्वाचीन आहे. तथापि ह्या निर्युक्तिसमकाली ब्राह्मण लोक मनुस्मृतीतील अनुलोम प्रतिलोम जातीची अशाच प्रकारे व्युत्पत्ति लावण्याचा प्रयत्न करीत होते. असे अनुमान करण्यास मुळीच हरकत नाही. आणि जैनांनी ही व्युत्पत्ति ब्राह्मणांकडूनच घेतली असावी अशी बळकट शंका येते. काही असो, निर्ग्रन्थ श्रमणांनी जातिभेदाला पूर्ण संमति दिल्याचा हा एक उत्तम दाखला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel