आपण स्वत:ची जी पात्रता समजतो, आपण स्वत:ला जी किंमत देतो, त्यावरून आपण ज्या कुळात जन्मलो, त्या कुळाची व ज्या समाजात आपण जन्मलेले आहोत त्या समाजाची- त्यांचीही पात्रता व किंमत कळून येते. शितावरून भाताची परीक्षा. समुद्रातील एका बिंदूला जीव चव तीच सर्व समुद्राची. वृक्षावरील एका फळाची जी चव त्यावरून सार्‍या वृक्षाची. समाजातीलचे एक व्यक्ती आपण असल्याने आपल्या किंमतीवरून व योग्यतेवरून आपल्या समाजाचीही किंमत व योग्यता दुसर्‍यांकडून अजमावली जाते. यामुळे स्वत:वर फार मोठी जबाबदारी आहे. परदेशात जाऊन तेथे जर आपण नादान ठरलो, नालायक ठरलो, तर आपल्या सार्‍या समाजाची नालायकी तेथे सिध्द केल्यासारखे होईल. आपल्या वर्तनाने आपल्या कुळाला, आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला व मानवजातीला कलंक लागता कामा नये, मान खाली घालावी लागता कामा नये, असे आपले वर्तन असले पाहिजे.

कुलाभिमानासारखा दुसरा कोणता अभिमान आहे ? प्रेरणा देणारा, चालना देणारा ह्यासारखा दुसरा कोणता अभिमान आहे ? हे ब्राह्मणाला शोभत नाही, हे क्षत्रियाच्या बच्च्याला शोभत नाही, हे शिवाजीच्या वंशजांस शोभत नाही, हे वसिष्ठ- विश्वामित्राच्या कुळांतल्यांना शोभत नाही, हे महाराष्ट्रीयांस शोभत नाही- यामध्ये काय अर्थ आहे ते आपल्या सदैव ध्यानात असले पाहिजे आणि जो दुसर्‍याला मान देतो, तो स्वत:च्या मानालाही जपेल. जो दुसर्‍याला स्वातंत्र्य देतो, तो स्वत:च्या स्वातंत्र्यालाही सांभाळील; ते तो गमावणार नाही.

हिंदुस्थानात हजारो वर्षे कुलाभिमानाचे शिक्षण काळजीपूर्वक देण्यात आले आहे. कुलाभिमान, वर्णाभिमान यांवरच राजकीय व सामाजिक इमारत आपल्याकडे उभारण्यात आली. आपल्या राष्ट्रीय व सामाजिक सुरक्षिततेचा पाया म्हणजे हा कुलाभिमान होता व आहे. अभिमान नाना प्रकारचे असतात व विशिष्ट मर्यादेतच ते गुण असतात. ती मर्यादा सुटली म्हणजे अभिमानाचा अहंकारी अभिनिवेश होतो; तो गुण न राहता दुर्गुण होतो. ब्राह्मण काय किंवा शूद्र काय दोघांना अभिमान, स्वाभिमान आहेच. परंतु शूद्राला तुच्छ मानून ब्राह्मण जेव्हा त्याला खाली मान घालावयास लावतो, त्यावेळेस ब्राह्मणाचा तो अभिमान म्हणजे अक्षम्य अपराध होय. आपण स्वत:ही योग्य अभिमान बाळगावा व दुसर्‍यालाही स्वाभिमानी राहावयास शिकवावे. माझी मान मी वर राखीन. त्याचप्रमाणे दुसर्‍याचीही वर राहावी म्हणून झगडेन. कुणाचीही मान अपमानाने खाली झालेली मला सहन होता कामा नये. कुलाभिमान व स्वातंत्र्य आपणाला प्रिय आहेत असे अशा वेळेसच दिसेल. जो दुसर्‍याच्या आईचा अपमान करतो, त्याला स्वत:च्या आईचाही खरा मान राखता येणार नाही. मी माझ्या आईला मान देतो, मी दुसर्‍याच्या आईसही मान देईन, मी माझे स्वातंत्र्य प्यार मानतो, दुसर्‍याचेही मानीन. मला स्वाभिमान आहे, दुसर्‍याच्याही स्वाभिमानाचे मी कौतुक करीन. सत्याची, सद्गुणाची, मीच पूजा करावी असे म्हणणे चमत्कारिक आहे. जे जे सत् आहे, त्याची पूजा सर्वांनी करावी, मी करावी व इतरांनाही करू दिली पाहिजे. जे गुण मला पूजनीय वाटतात, त्या गुणांची पूजा करावयास इतरांना शिकवीन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel