जे महात्मे आपणामध्ये वावरले त्यांच्या जीवनकथा लिहून पुढील पिढीच्या हातात देण्याची वेळ आता आली आहे. “ते थोर पुरुष ज्या काळात वावरले, ज्या काळात ते हिंडले, फिरले, बोलले, सहन करते झाले त्या काळात आपण असतो तर त्या महापुरुषांना आपण पाहिले असते तर......” असे पुढील पिढीला ही चरित्रे वाचून म्हणावेसे वाटेल. “ते महापुरुष नाही, तर नाहीत, परंतु त्या महापुरुषांना ज्यांनी पाहिले त्या महापुरुषांजवळ जे होते, त्या महापुरुषांच्या तोंडून ज्यांनी दोन शब्द ऐकले...... अशा व्यक्तींना तरी आपण पाहिले असते तर..... तो महापुरुष कसा बोले, कसा फिरे, कसा वागे, कसा मागे, कसा जनहिती जागे, तो खाई काय, पिई काय, तो कसा हसे, कसा बसे.... सारे विचारले असते.” असे भावी पिढी हळूहळून म्हणेल परंतु आपले भाग्य फार थोर आहे. आपण दोन्ही प्रकारचा अनुभव घेतला. प्रत्यक्ष महात्म्याचेही दर्शन घेतले व त्या महात्म्यांचे दर्शन ज्यांनी घेतले, ज्यांच्याजवळ त्यांच्या आठवणी होत्या.... त्यांच्याही गाठीभेटी आपल्या झाल्या. आपल्या सौभाग्यास सीमा नाही, पुण्याईस पार नाही.

श्रीरामकृष्णांनी चरित्रकथा वाचताना एक गोष्ट पटकन् ध्यानात येते. रामकृष्णांना स्वत:च्या अनुभवाबद्दल फार पूज्य बुध्दी वाटे. अनुभव, साक्षात्कार हे त्यांच्या जीविताचे ध्येय होते. जो जो थोर अनुभव मिळे तो ते आपल्या हृदयमादुसेत जपून ठेवीत. अनर्घ्य रत्नाप्रमाणे त्याला ते जपत. आणि असे शेकडो दिव्य अनुभव त्यांना मिळाले होते. अनुभवांची थोर व संस्मरणीय पावन व गंभीर अशा अनुभवांची अपरंपार संपत्ती त्यांच्याजवळ होती. इतकी संपत्ती होती, तरी ते प्रत्येक नवीन अनुभवाला जपत. स्वकष्टाने अगणित संपत्ती मिळविली तरीही संसारी पैनपैला जपतच असतो. घरात धान्याची कोठारे भरलेली असूनही अंगणात जर धान्याचे दाणे पडलेले दिसतात, तर खरा शेतकरी ते दाणे प्रेमाने उचलील व कोठारात आणून टाकील. रामकृष्ण आध्यात्मिक धान्याचे भांडारी होते. आध्यात्मिक कोठारे त्यांच्याजवळ भरलेली होती. तरीही प्रत्येक नवीन पवित्र अनुभवाला ते प्रेमाने उराशी धरीत, परंतु आपण किती बेफिकीर असतो. आपणाजवळ अगदी तुटपुंजी सामग्री असते. एका महाभाग्याने एखादा पावन क्षण जीवनात येतो, पवित्र अनुभव परंतु आपण तो साठवून ठेवीत नाही. त्यांची आठवणही आपण विसरतो. हे मानवी जीवन म्हणजे सोनियाचा कलश आहे. पवित्र अनुभवांची, जीवनाला विशुध्द व सुंदर, उन्नत व सरस करणार्‍या अनुभवांची सुधा ह्या कलशात भरावयाची असते. परंतु आपण काय करतो ?

सोनियाचा कलश । माजि भरला सुरारस

एखादा अमृताचा बिंदू मिळालाच तर त्याचीही किंमत आपणाला वाटत नाही. अशाने आपले जीवन समृध्द व सुंदर कसे होणार ? थेंबे थेंबे तळे साचे. कण कण गोळा करीत राहिले पाहिजे. श्रीरामकृष्ण एके दिवशी प्रात:काळी देवाच्या पूजेसाठी म्हणून फुले तोडीत होते. हातात परडी होती- फुले तोडीत होते. परंतु एकदम एक भव्य विचार त्यांच्या हृदयाकाशात ठळकपणे चमकला- “ही सर्व भूमाता म्हणजे एक विशाल पूजा मंदिरच आहे. ही झाडावरची फुले देवाच्या चरणांवर आधीच वाहिलेली आहेत; सृष्टीदेवीने विश्वंभराची पूजा आधीच केली आहे. नमस्कार करणे एवढेच आपले काम उरले.” त्या दिवसापासून श्रीरामकृष्णांनी देवपूजेसाठी पुन्हा म्हणून फुले तोडिली नाहीत; फूल पाहताच त्यांची जणू समाधी लागे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel