‘अग, मुलाला आई जवळ असेल तर खाऊ-खेळणी यांचा आनंद आहे. परंतु आई जवळ नसेल तर तो खाऊ, ती खेळणी काय कामाची? आई  जवळ असेल, तर सुखे भोगण्यात आनंद. परंतु आई हरवली असेल तर कोणाला सुखविलास करीत बसवेल? विमल, हिंदी लेखक मुल्कराज आनंद यांनी लिहीलेली ही गोष्ट. मागे एकदा मी ती वाचली होती; परंतु या गोष्टींतील भावार्थ आज जितक्या स्पष्टपणे माझ्या ध्यानात आला तितक्या स्पष्टपणे पूर्वी कधीही आला नव्हता!’

‘सांग ना आजचा भावार्थ!’

‘तो का सांगायला हवा?’

‘कृष्णनाथ, मी बुध्दिवान नाही!’

‘तसे नाही. विमल, माझ्या म्हणण्याचा असा का हेतू होता? तू फारच लावून घेतेस!’

‘सांग ना भावार्थ. आढवेढे नकोत!’

‘विमल, त्या मुलाची आई जवळ नव्हती, ती हरवली, म्हणून त्याने खाऊ, खेळणी यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आज आपली तरी आई आहे का आपल्याजवळ? ४० कोटींची भारतमाता, ती आहे का आपणा जवळ? ती शत्रूंनी तुरुंगात ठेवली आहे. माता बंधनात असता आपण का सुखपभोग घेत बसावे? आधी माता मिळवू या. मागून खाऊची गोडी, मागून खेळाची मौज!’

‘आणि विमल, माझ्या मनात आणखीही एक विचार आला. आई जवळ असली म्हणजे तिची मुले आपसात फार भांडत नाहीत; परंतु आई दूर गेली तर मुले भांडून भूस पाडतात. आज भारतमाता जवळ नसल्यामुळे आपण आपसांत भांडत बसलो आहोत. आई जवळ आली तर ही भांडणे बंद होतील. महात्माजींनी ‘ चले जाव’ अशी घोषणा केली. तुम्ही जा. आमची आई आमच्या स्वाधीन करा. तिला मुक्त करा! मग बघा आमची भांडणे थांबतात की नाही. विमल, देशात स्वातंत्र्याचा उग्र लढा चालू आहे. आपण काय करीत आहोत? मला झोप येत नाही!’

‘कृष्णनाथ, बाबांनी तुला शपथ घातली आहे. मला नाही घातली. मी घराबाहेर पडते, सभाबंदीचा हुकूम मोडते!’

‘गोळीबार होईल!’

‘तुझी विमल धन्य होईल. तू तिची समाधी बांध.’

‘काय बोलतेस?’

‘आता का भितोस? या विमलची कशाला आसक्ती? मी स्वातंत्र्यसंग्रामात जाते. मग काय व्हायचे ते होवो!’
त्यांची अशी बोलणी चालली आहेत, तोच बाहेर कसला तरी आवाज होत आहे असे वाटले. कृष्णनाथाने बाहेर पाहिले, तो पोलिसपार्टी आली होती. तो खाली गेला. त्याने दार उघडले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel