फुलाला राजधानीतील तुरुंगात ठेवणे धोक्याचे होते. केव्हा लोक बिथरतील त्याचा नेम काय? राजाने समुद्रकाठच्या एका दूरच्या तुरुंगात फुलाची रवानगी केली. फुलाची खोली एकान्त होती. त्या खोलीला एकच खिडकी होती. फुला उडी मारी व त्या खिडकीतून उचंबळणारा समुद्र बघे. समुद्राच्या लाटांवरचा फेस बघे. तुरुंगाच्या बागेतील फुले पाहून त्याला आनंद होई. आपल्याला बागेत पाठवतील का कामाला, येतील का फुलांना हात लावता? येतील का प्रयोग करता? असे त्याच्या मनात येई.

परंतु त्याला खोलीतून बाहेर काढण्यात येत नसे. खोलीतच त्याचे स्नान, खोलीतच शौचमुखमार्जन. तेथेच भोजन तेथेच शयन. तेथेच चिंतन, तेथेच मनन. ती खोली म्हणजेच सारे काही.

त्याला दोन मडकी देण्यात आली होती. फुलाने एका मडक्याची कुंडी केली. खिशातील एक कलम त्याने त्या कुंडीत लावले. एका शिपायाजवळून त्याने माती घेतली होती. त्या मडक्यात माती भरून त्यात तो प्रयोग करू लागला. निळया फुलावर सोनेरी छटा उठवण्याचा प्रयोग. मडयातील वेल वाढू लागला, कोवळी पाने फुटली, ती पाने पाहून फुलाला आनंद होई, त्या पानांकडे तो दिवसभर बघत बसे.

समुद्राकाठच्या खिडकीतून एके दिवशी एक पक्षी खोलीत आला, कोठून आला तो पक्षी? निळा निळा पक्षी, त्या खोलीत येऊन तो पक्षी गाणे गाई, काही वेळ त्या खिडकीत बसून निळया समुद्राकडे पुन्हा उडून जाई. तो पक्षी आपल्या आत्याकडून का आला होता? आत्याचा निरोप घेऊन तो येतो की काय? असा विचार फुलाच्या मनात आला. आत्याची आठवण येऊन फुला सद्‍गदित झाला. तो पक्षी आला की फुला त्याच्याकडे प्रेमाने बघे. त्या पक्ष्यासाठी आपल्या भाकरीतील तुकडा तो ठेवी. पक्षी येताच तुकडा फेकी. पक्षी खाली येई व चोचीने तो तुकडा घेऊन पुन्हा खिडकीत बसे. पुढे-पुढे तर फुलाच्या हातातूनच तो पक्षी तुकडा घेई. पक्षी फुलाचा मित्र बनला.

एके दिवशी जोडपे तेथे आले, नर व मादी दोघे आली. फुलाने दोघांना दोन तुकडे दिले. त्या जोडप्याने खोलीची पाहाणी केली, एके ठिकाणी घरटे बांधण्याचे त्यांनी ठरविले, दोघे गवत, पाला, काडया, चिंध्या आणू लागली. घरटयाचे काम सुरू झाले. नर व मादी दोघे खपत. मधून-मधून गोड-गोड गाणी गात. एकमेकांच्या चोचीत चोच घालीत, फुलाच्या डोक्यावरुन भुर्र करीत खोलीत फेर्‍या घालीत. घरटे तयार झाले. मादीने त्यात अंडी घातली. मादी घरटयात बसून राही. अंडयांना ऊब देई.

फुला समुद्रकाठच्या तुरूंगात गेल्यापासून कळी दु:खी झाली. कळीला वाटत होते की आता हा कैदी आपल्या तुरूंगात राहील, रोज त्याला भेटता येईल. त्याच्याजवळ बोलता येईल. लिहा-वाचायला शिकता येईल; परंतु तिची निराशा झाली. तिला वाईट वाटले. तिचा आनंद अस्तास गेला. ती ना खाई ना पिई. ती एकटी बसे. ती न हसे, न खेळे. ती फिक्कट दिसू लागली. ती अशक्त झाली.  शेवटी ती अंथरुणाला खिळली.

‘कळये, तुला काय होते?’ पित्याने विचारले.

‘मला सांगता येत नाही. काही तरी होत आहे खरे. मला काही सुचत नाही, काही रूचत नाही, मला कंटाळा आला आहे.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel