ताठच रहावें, वाकूं नये, कारण ताठ रहाणें हेंच पौरुष आहे.  भलत्या ठिकाणी मोंडलें तरी हरकत नाहीं परंतु या जगात वाकूं नये असा अत्युत्तम ध्येयवाद ज्या कादंबरींत आहे, त्या कादंबरीनें संपत्ति, साम्राज्य, वैर, युध्द यांच्या पाठीमागें लागलेल्या युरोपचे लक्ष खेंचून घेतलें यांत नवल काय आहे?  आपल्याला निद्रेंतून जागें करण्याकरितां दिव्य संदेश घेऊन हा कोणी तरी अवतारी पुरुष आला आहे.  असें आधिभौतिक संस्कृतीच्या भाराखालीं दडपून गेलेल्या युरोपला वाटलें आणि त्यांनी या नवीन द्रष्ट्याचें मोठ्या आनंदाने स्वागत केलें! रोमन रोलंड यांचे इतर अनेक ग्रंथ आहेत.  परंतु वरील गंथाची सर दुस-याला येणार नाहीं.  याच ग्रंथाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालें आहे.  आणि 'विसाव्या शतकांतील पहिल्या नंबरचा ग्रंथ ' असें शिफारसपत्र अनेक ज्ञात्या लोकांनी त्या ग्रंथाला दिलें आहे.

रोमन रोलंड हे उत्कृष्ट लेखक आहेत तसेच द्रष्टेहि आहेत.  जगांत बंधुभाव नांदावा आणि राष्ट्राराष्ट्रांमधील वैर लयाला जावें हा दिव्य संदेश त्यांनी जगाला दिला आहे. भिन्न संस्कृतीच्या लोकांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून विचारैक्य घडवून आणावें असा उपदेश त्यांनी आपल्या ग्रंथातून केला आहे.  ते उच्चध्येयवादी आहेत.  हे सांगावयास नकोच,  परंतु आपलीं ध्येयें आणि कृति यांचा मेळ घातला पाहिजे असें त्यांचे निक्षून सांगणें आहे.  एके ठिकाणीं ते म्हणतात, 'अन्याय होत असतांना जो उघडया डोळयांनी तो पहातो आणि त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत नाहीं, त्याला माणूस ही पदवीसुध्दा धड शोभणार नाहीं. 'आपल्या आयुष्यांत त्यांनी अन्यायांशी अनेकदां झुंजी केल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या कोमल मनावर भयंकर आघात झाले आहेत.  तरी मानव जातीच्या भवितव्याविषयीं त्यांच्या मनांत केव्हाहिं संशय उत्पन्न झाला नाहीं.  जगांतील युध्दें नाहींशी झाली पाहिजेत आणि निरनिराळ्या राष्ट्रांत सलोखा आणि प्रेम हीं राहिली पाहिजेत.  याकरितां त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत.  १९२१ सालीं महात्मा गांधींनी सत्य अहिंसा यांच्या भरभक्कम पायावर उभारलेली असहकारितेची चळवळ पाहून त्यांचे लक्ष महात्मा गांधींकडे गेलें.  त्यांनी महात्मा गांधींच्या मतांचा अभ्यास करून १९२४ सालीं एक पुस्तक लिहिलें आणि गांधी हे खरोखरच महात्मा कसे आहेत, त्यांचा आत्मा विश्वव्यापी कसा आहे हें जगाच्या निदर्शनास आणून दिलें.  तेव्हांपासून दोघांनाहि एकमेकांस भेटण्याची इच्छा होती.  तो योग इतक्या वर्षांनी घडून आला हें मोठें सुचिन्हच म्हटलें पाहिजे.  या योगाने युध्दाचा आणि मनुष्यहानीचा संभव थोडासा कमी झाला तरी तें मोठेंच कार्य होणार आहे.  महात्मा गांधी, रोमन रोलंड, इन्स्टेन यांच्यासारख्या महापुरुषांनी एकी करून युध्दें अशक्य करून टाकलीं पाहिजेत.  युध्दें अशक्य होतील ; मात्र आपण या महात्म्यांचा संदेश ऐकून त्याप्रमाणें वागावयास तयार झाले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel