कन्नड साहित्य समृध्द आहे. सुंदर आहे. हिंदुस्थानात पहिल्याने लघुकथा कुठे सुरू झाल्या असतील तर कन्नड भाषेत. जुन्या कन्नड साहित्यात थोर थोर कवी आहेतच. परंतु आजचे कन्नड कवीही थोर आहेत. माझे मित्र मला अनेक कवींचा इतिहास सांगते झाले. अनेकांच्या गंमतीही. कन्नड भाषेत श्री. बेन्द्रे म्हणून महाकवी आहेत. सोलापूरला ते प्राध्यापक आहेत. त्यांच्या कविता उत्तम आहेत. प्रतिभा आणि शब्द दोहोंची अपार समृध्दी त्यांच्या काव्यात आहे. ते अरविंदांचे भक्त. १९२९-३० साली त्यांनी देशभक्तीपर एक अमर कविता लिहिली. सरकारने त्यांना एका गावी स्थानबध्द केले. ते शाळेत शिक्षक होते. त्यांची नोकरी गेली. घरी अडचण. चुलते मदत करीत. पुढे चुलतेही वारले. बेळगावला कन्नड साहित्य संमेलन एकदा भरले होते. त्यांनी आपली ''हक्किहारुतिदे- पक्षी उडत आहे.'' ही भव्य कविता म्हटली. काळ हाच कोणी पक्षी, अशी कल्पना करून केलेली ही कविता आहे. म्हैसूरकडून आलेले एक थोर साहित्यिक ती कविता ऐकून वेडे झाले. ते मोठे सरकारी अधिकारी होते. ते श्री. बेन्द्रे यांना म्हणाले, ''मला तुमचा भाऊ माना. तुमची आर्थिक अडचण आहे. मी मदत पाठवीन ती प्रेमाने घ्या. मनात काही आणू नका.'' आणि हे मित्र मदत पाठवीत. आता बेंद्रे सोलापूर कॉलेजात कन्नडचे प्राध्यापक आहेत. त्यांची वृत्ती अति समाधानी! त्यांची शान्ती कधी ढळत नाही, ते एकदा कोणत्या तरी गावी होते. तेथे चिंचेचे एक मोठे झाड होते. त्याला ना फूल ना पान. जवळजवळ वर्षभर त्या झाडाला पान फुटत नाही. बेन्द्रे तेथून धारवाडला आले, परंतु काही महिन्यांनी त्या चिंचेच्या झाडाचे काय झाले म्हणून ते पाहायला पायी गेले तो ते झाड पानाफुलांनी नटले होते. बेन्द्रे उचंबळले. त्यांनी 'बहरलेला चिंचवृक्ष' या अर्थाची सुंदर कन्नड कविती लिहिली. सुधामाई, अशा कथा ऐकताना मी रंगत होतो. आणि कवी व्ही. सीतारामय्या यांची एक ''अभी: अभी:'' म्हणून उत्कृष्ट कविता आहे ती ऐकली. जगातील यज्ञ नि बर्लिदाने यांतून तोच ध्वनी येत आहे. सॉक्रेटिसाला दिलेला विषाचा पेला, ख्रिस्ताचा क्रॉस, ब्रूनोला जाळणे, या सर्वांतून ''भिऊ नका भिऊ नका'' असा घोष येत आहे. हुकूमशहांच्या छळातून, जुलमातून ''अभी: अभी:'' असा अमर आवाज येत आहे. भव्य कविता! शब्दही अर्थपूर्ण व जोरदार असे आहेत. मी ती कविता ऐकत होतो व रोमांचित होत होतो. आणि जगाची प्रगती निर्भयपणेच झाली आहे. गीतेच्या सोळाव्या अध्यायात ''अभय'' हा पहिला सद्‍गूण म्हणून सांगितला आहे. महात्माजींनी सर्वात मोठी देणगी कोणती दिली असेल तर अभयतेची. त्यांनी सर्व राष्ट्राला निर्भय केले. 'नि:शस्त्र असू तरी अन्यायासमोर मान वाकवणार नाही', 'मरू पण चलेजाव म्हणू' असे म्हणायला नि तद्‍नुरूप  वागायला राष्ट्राला त्यांनी शिकविले. जे राष्ट्र निर्भय आहे, ते मुक्त आहे. ते सर्व क्षेत्रांत जाईल, प्रयोग करील, पुढे जाईल. सा-या इतिहासाची ही शिकवण आहे. भित्र्याला मरण आहे. निर्भळ असेल तोच खरा जिवंत.
धारवाडची हवा किती सुंदर! उन्हाळयातही काहींना ब्लँकेट पांघरावे लागते! थंडगार सुंदर हवा! एक सद्‍गृहस्थ म्हणाले, ''सा-या हिंदुस्थानात अशी हवा नाही.'' परंतु येथे पाण्याचे हाल. एक दिवसाआड नळाचे  पाणी. उन्हाळयात थोडे येते. काही वर्षांपूर्वी येथील म्युनिसिपालिटीच्या भव्य उद्‍घाटनासाठी म्हैसूरकडचे एक थोर गृहस्थ आले होते. ते म्हणतात, खासगी म्हणाले, ''एवढी इमारत बांधण्याऐवजी पाण्याची व्यवस्ता करते तर? लहानशा इमारतीतही म्यु. कामकाज चालले असते!'' धारवाड शहर दूरवर पसरले आहे. चार मैल लांब, चार मैल रुंद असा घेर आहे! म्युनिसिपालटीचे उत्पन्न थोडे, परंतु शहराचा पसारा मोठा. जवळ जवळ ३२ मैलांचे रस्ते सांभाळावे लागतात. दोहोंकडची गटारे हवीत! तरीही स्वच्छता  बरी वाटली. रस्ते सुरेख आहेत. येथे पाण्याची व्यवस्था झाली तर हे  शहर झपाटयाने वाढेल . वाढायला ऐसपैसे जागा भरपूर आहे. शिक्षणाच्या सोयी आहेत. शेतकी कॉलेज, फॉरेस्ट कॉलेज अशी कॉलेजे झाले आहेत. येथे कोकणातील, देशावरची दोन्ही पिके होतात. शेतकी कॉलेजला आदर्श जागा! पाण्याच्या व्यवस्थेच्या योजना आहेत, परंतु प्रत्यक्षात येतील तेव्हा ख-या!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel