“माले. तिकडे जाणे म्हणजे संकट आहे. तुरुंगात जावे लागेल, आमचे काही नाही; परंतु तुझे काय होणार? तुरुंगात जाणे उद्या लग्नाला आड न येवो म्हणजे झाले!” तो म्हणाला.

“माझ्या लग्नाची तुम्ही काळजी करू नका म्हणून मागेच नाही का मी सांगितले? देवाने कोणी जीवनाचा प्रेमळ उदार सोबती दिला तर त्याचा हात हातात घ्यावा, नाहीतर असेच राहून होईल ती घरीदारी सेवा करावी, असे मी मनात निश्चित केले आहे. तू मला घेतल्याशिवाय जाऊ नकोस. मी बोजारूप नाही होणार. भाऊ, मालतीत दुस-या कोणाचा तरी संचार झाला आहे. नेभळी, भेकड, मुखदुर्बळ मालती मेली, ही नव-मालती आहे,-- क्रांतिकारक मालती!”

“तुझा धीटपणा तुला बघायला आलेल्या त्या बावळटाला तू खडे सवाल केलेस तेव्हाच दिसून आला होता. मालती काही म्हण, तुला न्यायला धीर होत नाही. समज, -- लाठी बसली, गोळीबार झाला, दंगल झाली. दगड लागला तर कसे व्हायचे? दादा काय म्हणेल? आई वरून काय म्हणेल? तू बाबांची किती लाडकी होतीस! लहानपणी आईने तुला एकदा रागाने मार दिला तर बाबा धावून आले व आईला म्हणाले, ‘मला मार, तिला मारू नको.’ त्या शब्दांनी आईला मेल्यासारखे झाले. पुन्हा म्हणून तिने तुला कधी हात लावला नाही. असा तुला का आगीत नेऊ!”

“भाऊ, माझे सुख तुला प्रिय आहे ना?”

“हे काय विचारतेस. माले!”

“मग माझे सुख सुंदरपुरात आहे. माझे सुंदर ध्यान तेथे आहे. त्या मूर्तीच्या सान्निध्यात मी काळिकाळासमोर उभी राहीन.”

“आणि ती मूर्ती तुरुंगात पडला तर?”

“त्या मूर्तीचा ध्येयदेव हृदयाशी धरून मी आगीत उडी घेईन.”

दादाही बाहेरून आला. तिघे भावंडे जेवायला बसली. जेवताना सारी चर्चा झाली. दोन दिवसांनी वैनी यायची होती. ती आल्यावर मालती नि सखाराम यांनी जावे असे ठरले.

दुस-या दिवशी तशा अर्थाचे पत्र सखारामने घनाला लिहिले. मालती आनंदली. तिच्या तोंडावर कधी नव्हते असे तेज फाकले. कधी दिसले नव्हते असे कोवळे लावण्य शोभले.

दोघे भाऊ मनात म्हणाले, “ सुखी होवो!”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel