वैदिक संस्कृतीचा उगम व विकास

६३. वरील विवेचनावरून दिसून येईल कीं, वैदिक संस्कृतीचा उगम बाबिलोनियन संस्कृतींत आहे. बाबिलोनियन भाषेचें नीट अध्ययन केल्याशिवाय पुष्कळशा वैदिक ऋचांचा अर्थ बरोबर समजणार नाहीं, अशी माझी ठाम समजूत आहे. इन्द्राचें देव्हारें, सोमपानाचा विधि इत्यादिकांचें मूळ बाबिलोनियन संस्कृतींतच आहे. त्या संस्कृतीच्या आधारें एलाममधील लोकांनी आपली संस्कृति बनवण्याचा प्रयत्‍न केला, व तेथेंच पुष्कळशा ऋचा रचल्या गेल्या असाव्या.

६४. वामदेव ऋषि एलाममधील रहाणारा दिसतो. ऋ० ४।१८ ज्या सूक्ताचा तो कर्ता समजला जातो, त्या सूक्ताच्या शेवटी तो म्हणतो--

अवर्त्या शुन आंत्राणि पेचे न देवेषु विविदे मर्डितारं ।
अपश्यं जायाममहीयमानामधा मे श्येनो मध्वा जभार ।।

(खाण्याला कांहीं न मिळाल्यामुळें मी कुत्र्याचीं आंतडीं शिजविलीं. देवामध्यें रक्षण करणारा मला कोणी सांपडेना. माझ्या बायकोनें केलेली माझी विडंबना मी पाहिली. अशा स्थितींत श्येनानें (इंद्रानें) मला मध दिला.) यावरून असें दिसतें कीं, हा ऋषि पूर्ववयांत अत्यंत दरिद्री होता. पुढें इंद्राचीं स्तोत्रें रचण्याचा धंदा त्यानें पतकरला;  आणि इंद्रानें त्याला मोठी देणगी दिली. त्याच्या नांवांत देव शब्द आल्यामुळें तो मूळचा एलाममधील रहाणारा असावा.

६५. परंतु वसिष्ठ ऋषि किंवा वसिष्ठांचे कूळ दासांपैकीं असावें. कारण तो व त्याचे भाऊबंद दिवोदासाचे व सुदासाचे आश्रित दिसतात. ‘एवेन्नु कं दाशराज्ञे सुदासं प्रावदिंद्रो ब्रम्हणा वो वसिष्ठाः’ ऋ० ७।३३।३ (त्याचप्रमाणें, हे वसिष्ठहो, दहा राजे युद्धास आले असतां तुमच्या स्तोत्रामुळें इंद्रानें सुदासाचें रक्षण केलें). ह्याच सूक्तांत पांचव्या ऋचेंत स्तवन करणार्‍या वसिष्ठाचें वचन इंद्रानें एंकलें असें म्हटलें आहे. यावरून सुदासाच्या वतीनें वसिष्ठ किंवा वसिष्ठ कुलापैकीं कांहींजण इंद्रापाशीं रहात असत असें वाटतें.

६६. वर एका ठिकाणीं सांगितल्या प्रमाणें इंद्र जर चाळीस वर्षेपर्यंत शंबराशीं लढत होता तर तो बराच दीर्घायुषी असला पाहिजे. त्याच्या मरणानंतर कांहीं काळापर्यंत इन्द्राची परंपरा चालली असणें संभवनीय आहे. उद्योगपर्वांत इन्द्र नष्ट झाल्यावर नहुषाला देवांनी अभिषेक केल्याची कथा आहे. त्यामुळें असें दिसून येतें कीं, एक इन्द्र मेल्यावर एलामांतील सरदार लोक त्यांच्यापैकीं जो कोणी श्रेष्ठ असेल त्याला इन्द्रपद देत असत. पण ही परंपरा दीर्घ काळपर्यंत चालली नसावी. तसें असतें तर इन्द्राचा उल्लेख बाबिलोनियन वाङ्मयांत बर्‍याच ठिकाणीं आला असता.

६७. इन्द्राच्या पदरचे स्तुतिपाठक असोत किंवा दासांपैकीं स्तुतिपाठक असोत, त्यांचा मुख्य धंदा म्हटला म्हणजे स्तोत्रें रचून ती इन्द्रासमोर किंवा जेथें जेथें इन्द्राचा उत्सव होत असे तेथें तेथें गावयाचीं. याचमुळें वेदांत जवळ जवळ एक चतुर्थांश सूक्तें इन्द्राचीं सांपडतात. त्याच्या मागोमाग अग्नि, वरुण वगैरे देवतांची सूक्तें आहेत. यापैकीं उषादेवीचीं सूक्तें बाबिलोनियांतून आलीं असावीं. मित्र, वरुण व नासत्य हे आर्यांचे देव. त्यांची सूक्तें एलाममध्येंच तयार झालीं असलीं पाहिजेत. आणि विष्णु दासांचा देव होता; तेव्हां आर्यांनी सप्तसिंधु प्रदेश जिंकल्यावर त्याचीं जीं तेथें स्तोत्रें गाण्यांत येत होतीं, त्यांचें रूपांतर ऋग्वेदांतील विष्णुसूक्तांत झालें असावें, अग्निपूजा आर्य लोकांत प्रचलित होती खरी, तथापि वेदांत जीं अग्निसूक्तें आहेत त्यांत बाबिलोनियांतील य, दमुत्सि वगैरे  देवतांचे मिश्रण झालें असावें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel