बुद्धसमकालीन श्रमणसंस्था

२३. बुद्धसमकालीं बासष्ट श्रमणपंथ अस्तित्वांत होते असें ब्रह्मजाल सुत्तावरून व सुत्तनिपातांतील ‘यानि च तीणि यानिच सट्ठि१  या वाक्यावरुन दिसून येतें. या वाक्यांत त्रेसष्ट श्रवणपंथ म्हटले आहेत. कारण बौद्ध पंथाचीहि त्यांत गणना केली आहे. ब्रह्मजाल सुत्तांत ह्या बासष्ट मतांचें विस्तारानें वर्णन करण्याचा प्रयत्‍न केला आहे. पण तें वर्णन काल्पनिक असावें अशी बळकट शंका येते. ज्या वेळी हें सुत्त लिहिलें त्या वेळीं बुद्धकाळीं बासष्ट पंथ अस्तित्वांत होते ही परंपरा कायम होती. पण त्यांचे विचार व आचार ह्या सुत्तकाराला मुळींच माहीत नव्हते. निरनिराळ्या पंथांचे भेद पाडून कशी बशी बासष्ट ही संख्या भरून काढण्याचा त्याचा प्रयत्‍न दिसतो. बुद्धकाळीं जे पंथ अस्तित्वांत होते, ते सर्वच मोठ्या महत्त्वाचे होते असें वाटत नाहीं. दुसरें असें की, लहानसहान पंथ मोठ्या संप्रदायांत मिसळून गेले असावे, व जे किरकोळ पंथ होते त्यांचे आचार विचार महत्त्वाचे नसावे. ब्रह्मजाल सुत्ताशिवाय इतर अनेक सुत्तांत सहा संघनायकांची नांवें वारंवार येत असतात. तेव्हां त्यांचे सहाच संघ बुद्धसमकाळीं अत्यंत महत्त्वाचे होते असें म्हणावें लागतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ सुत्तनिपात, सभियसुत्त, गाथा २९. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२४. ह्या सहा संघापैकीं एका संघाचा आचार्य पूरण कश्यप हा होता. तो म्हणे कीं, “एकाद्यानें कांहीं केलें अथवा करविलें, कापिलें किंवा कापविलें, त्रास दिला किंवा देवविला, शोक केला किंवा करविला, त्रास झाला अथवा दिला, भय वाटलें किंवा दुसर्‍यास भय दाखविलें, प्राण्यास ठार मारलें, चोरी केली, दरोडा घातला, एक घर लुटलें, वाटमारी केली परदारागमन केलें, असत्य भाषण केलें, तरी त्यास पाप लागत नाहीं. तीक्ष्ण धारेच्या चक्रानें जरी एकाद्यानें या पृथ्वीवरील प्राण्यांची एक रास केली, एक ढीग केला, तरी त्यांत मुळींच पाप नाहीं.... गंगा नदीच्या उत्तर तीरावर जाऊन जरी एकाद्यानें दानें दिली व देवविलीं, यज्ञ केले अथवा करविले, तरी मुळींच पुण्य लागत नाहीं. दान, धर्म, संयम, सत्यभाषण यांच्या योगानें पुण्य लागत नाही.” ह्या पूरण कश्यपाच्या वादाला ञ्प्रक्रियवाद म्हणत.

२५. दुसर्‍या संघाचा आचार्य मक्खलि गोसाल हा होता. तो म्हणें, “प्राण्यांच्या अपवित्रतेस कांहीहि हेतु नाहीं, कांहींहि कारण नाहीं. हेतूशिवाय, कारणाशिवायच प्राणी अपवित्र होतात. प्राण्याच्या शुद्धीला कांहीहि हेतु नाहीं, कांहीहि कारण नाहीं. हेतूशिवायच, कारणाशिवायच प्राणी शुद्ध होतात. स्वत:च्या किंवा दुसर्‍याच्या सामर्थ्यानें कांही होत नाही. बळ, वीर्य, पुरुषार्थ किंवा पराक्रम नाहीं. सर्व प्राणी दुर्बळ व निर्वीर्य आहेत. ते नियति (नशीब), संगति व स्वभाव यांच्या योगानें परिणत होतात.... शहाणे व मूर्ख चौर्‍याऐशीं लक्ष महाकल्पांच्या फे-यांतून गेल्यावरच त्यांच्या दु:खाचा नाश होतो.”  ह्या मक्खलि गोसालाच्या मताला संसारशुद्धिवाद म्हणत असत. याला नियतिवाद पण म्हणतां येईल.

२६. तिसर्‍या संघाचा प्रमुख अजित केसकंबली हा होता. तो म्हणे, “दान, यज्ञ, होम हे कांहींहि नाहींत. चांगल्या-वाईट कंर्माचें फळ नाहीं. इहलोक नाहीं परलोक नाहीं... मनुष्य चार भूतांचा बनलेला आहे. जेव्हां तो मरतो तेव्हां त्याच्यामधील पृथ्वीधातु पृथ्वीस, आपोधातु पाण्यास, तेजोधातु तेजास, व वायुधातु वायूस जाऊन मिळतो; आणि इंद्रियें आकाशाप्रत जातात. मेलेल्या माणसास चार पुरुष तिरडीवर घालून वाटेंत त्याचे गुण गात गात श्मशानांत घेऊन जातात. तेथें त्याच्या अस्थि पांढर्‍या होतात, व आहुति भस्मसात् होऊन जातात. दानाचें हें खूळ मूर्ख माणसांची काढलें आहे. जे कोणी आस्तिकवाद सांगतात, त्यांचें तें बोलणें निवळ खोटें आहे, व्यर्थ बडबड आहे. शहाणे व मूर्ख या दोघांचाहि शरीरभेदानंतर उच्छेद होतो. मरणानंतर त्यांचे कांहींहि रहात नाहीं.” ह्या केसकंबलीच्या मताला उच्छेदवाद म्हणत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel