७६. तसाच कांहींसा प्रकार महादेवाचा दिसतो. वेदकालापासून तहत शकांपर्यंत महादेव म्हणजे अत्यंत क्रूर देव. त्याची प्रार्थना एवढ्याचसाठीं करावयाची कीं, त्यानें भक्तांचा संहार करूं नये. शूलगवादिक यज्ञांच्या रूपानें त्याला जें बलिदान देण्यांत येत असे, तें बौद्ध धर्माच्या प्रभावानें बंद पडलें. तरी पण त्याच्यांतील क्रूरपणा नष्ट झाला नाहीं. त्याची थोडी बहुत संहारक शक्ति कायम राहिली. अशा वेळीं कोणी तरी श्वेताश्वतर नांवाच्या पंडितानें कोणा तरी शक राजाला प्रसन्न करून घेण्याच्या हेतूनें श्वेताश्वतरोपनिषद् लिहिलें असावें. त्यांत बायबलाप्रमाणेंच भक्तिमार्गाचें महत्त्व वर्णिल्याचें दिसून येतें. हा भक्तिमार्ग बायबलमधून घेतला असेल याला कांहीं आधार नाहीं. परंतु तो बायबलांतून घेतला नाहीं, असेंहि म्हणतां येत नाहीं. बायबलमधील जेहोवा व उपनिषदांमधील परमात्मा ह्यांचें ह्या उपनिषदांत मिश्रण झालेलें सांपडतें; आणि तें कोणत्या तरी शक राजाला प्रसन्न करण्याच्या उद्देशानें केलें असावें, अशी बळकट शंका येते. अल्लोपनिषद् रचून अकबराला संतुष्ट करण्याचा जसा ब्राह्मणांनी प्रयत्‍न केला, तसाच हाहि असावा.

७७. जेहोवाला बायको नव्हती, पण महादेवाला होती. ही कल्पना कोठून आली हें सांगतां येत नाही. १. पण तिचा फायदा असा झाली कीं, सामान्य लोकांत अनेक देव आणि ज्या अनेक देवी फैलावल्या होत्या त्या सर्वांचा महादेव व पार्वती ह्या जोडप्यांत अंतर्भाव करणें ब्राह्मणांना शक्य झालें. त्यांच्या पूजेनें शकांची आराधना करणें सोपें होते; आणि दुसर्‍या बाजूला सामान्य जनतेलाहि कह्यांत आणण्याचा तो एक राजमार्ग होता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( By the side of En-Iil in the early days there was ranged a consort, Nin-Iil, the queen of the lower world, and when En-Iil was identified with Bel she became Belit. She is also called Nin-khar-sag, “queen of the great mountain.” [ The Religion of Babylonia and Assyria, by R.W. Rogers, p. 81.] ह्या देवतेशीं तर पार्वतीचा संबंध नसेल ना ?)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
७८. महादेव व पार्वती हीं ब्राह्मणांचीं दैवतें नसतां एकाएकीं तीं सर्व देवांपेक्षां श्रेष्ठ कशीं बनलीं, याचें वर्णन महाभारतांतील शान्तिपर्वांत सांपडते. १  “दक्षानें हिमालयावर गंगाद्वारीं यज्ञाला आरंभ केला. त्या यज्ञाला देव, दानव, गंधर्व, पिशाच, उरग, राक्षस, ऋषि इत्यादिक सर्व आले. तेव्हां दधीचि म्हणाला, ‘ज्यांत रुद्राची पूजा केली जात नाहीं, तो यज्ञहि नव्हे व धर्महि नव्हे. तुम्ही ह्या पशूंना बांधण्यांत व मारण्यांत काय लागलां अहां ? काय हा काळाचा विपर्यास ? ह्या यज्ञानें घोर विनाश होणार, हें ह्यांना समजत नाहीं कसे ?’
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ कुंभकोण, अध्याय २९०; औंध, अ० २८४.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
७९. “त्यानंतर त्या ऋषीनें ध्यानचक्षूनें महादेवाला, पार्वतीला व तिच्याजवळ असलेल्या नारदमुनीला पाहिलें, आणि तो संतुष्ट झाला. दक्षादिकांनी कट करून महादेवाला निमंत्रण दिलें नाहीं हें त्यानें जाणलें, व तेथून जरा दूर अंतरारवर जाऊन तो म्हणाला, ‘अपूजनीय देवतांच्या पूजेपासून व पूजनीय देवतांची पूजा न केल्यानें मनुष्य सदोदित नरहत्येचें पाप पावतो.... येथें हा पशुपति, जगाचा कर्ता, यज्ञाचा भोक्ता, सर्वांचा प्रभु आलेला आहे. त्याला तुम्ही पहात नाहीं काय ?’  दक्ष म्हणाला, ‘शुलहस्त, जटाधारण करणारे व अकरा ठिकाणीं रहाणारे असे पुष्कळ रुद्र आमच्याजवळ आहेत. ह्या महेश्वराला मी ओळखत नाहीं.’
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel