१०९ “बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी अशोक राजानें सर्व जग जिंकले; आणि त्याचा मान दूरदूरच्या प्रदेशांतहि वाढला. त्रिरत्‍नांचा तो अत्यंत आदर करी, व सगळ्या प्राणिमात्रांबद्दल प्रेम बाळगीत असे. त्या वेळीं एक हजार भिक्षूंत भांडण उत्पन्न झालें. पैकीं पांचशे भिक्षु अरहन्त होते, व पांचशें दांभिक होते. त्यांच्यापैकीं बरे कोण व वाईट कोण, हें अशोकाला माहीत नसल्यामुळें त्या सर्वांनाच जलसमाधि देण्याच्या उद्देशानें गंगेच्या काठीं त्यानें गोळा केलें. अरहन्तांना हें समजलें, तेव्हां ते एकदम आकाशमार्गानें ह्या प्रदेशाला (काश्मीरला) आले. त्यांचे ऋद्धिबल पाहून अशोकानें त्यांना स्वदेशीं येण्यास आमंत्रण केलें. पण ते गेले नाहींत. तेव्हां अशोकानें या प्रदेशांत पांचशें संघाराम बांधले; आणि हा देश संघाला दान दिला.

११० “बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर ४०० व्यावर्षी कनिष्क राजा गादीवर आला... त्यानें आपल्या कारकिर्दीत या प्रदेशांत एक भिक्षूंची मोठी सभा भरवली, व त्रिपिटकाचें शुद्धीकरण करविलें. हें संस्करण त्यानें ताम्रपटांवर लिहवून एका मोठ्या दगडाच्या पेटींत भरून जमिनींत गाडलें, व त्याच्यावर एक स्तूप बांधला. ह्या देशांतून जातांना त्यानें गुढघे टेकून पुनरपि हा सर्व देश संघाला दान दिला. कनिष्काच्या मरणानंतर क्रीत लोकांनी राज्यव्यवस्था आपल्या ताब्यांत घेतली, भिक्षूंना या प्रदेशांतून हांकून दिलें, आणि बुद्धधर्माचा विध्वंस केला.

१११. “तुखार देशांत हिमतल येथें रहाणारा राजा शाक्य वंशीय होता. तो बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर सहाशें वर्षांनी गादीवर आला. क्रीतांनी बौद्धधर्माचा विध्वंस केल्याची गोष्टी जेव्हां त्याला समजली, तेव्हां त्यानें आपल्या राज्यांतील अत्यन्त शूर असे तीन हजार योद्धे गोळा गेले, व त्यांना कारवानांचा वेश देऊन काश्मीर देशांत प्रवेश केला. ह्या कारवानांजवळ निरनिराळा माल होता खरा, पण आंत त्यांचीं सर्व शस्त्रास्त्रें छूपविलीं होतीं. काश्मीरच्या राजानें आदरातिथ्यपूर्वक त्यांचें स्वागत केलें. तुखारचा राजा कारवानच्या वेशांतील पांचशें योद्धे व राजाला देण्यासाठीं उत्तमोत्तम पदार्थ बरोबर घेऊन राजाच्या भेटीला गेला. तेथें एकाएकीं आपली पगडी खालीं टाकून त्यानें क्रीतांच्या राजावर हल्ला केला, व त्याला ठार केलें, आणि त्याच्या अमात्यांना हांकून दिलें; पण लोकांना कोणत्याहि प्रकारे त्रास दिला नाहीं. भिक्षूंना पुन्हा बोलावून त्यांच्यासाठीं त्यानें एक संघाराम बांधला, व त्यांची तेथें स्थापना केली. पश्चिम घाटांतून तो परत गेला. जातेवेळी त्यानें पूर्वेच्या बाजूला साष्टांग दंडवत घालून हा देश भिक्षुसंघाला दान दिला.

११२. “क्रीतांनी अशा प्रकारें अनेक वेळां भिक्षुसंघाविरुद्ध बंड केलें आहे; व त्यामुळें उत्तरोत्तर ते बुद्धधर्माचा द्वेष करीत आले आहेत. कांहीं वर्षांनंतर पुन्हा त्यांनी हें राज्य बळकावलें. त्यामुळे ह्या प्रदेशांत सध्या बौद्धधर्माचा विशेष प्रसार नाहीं. मिथ्यादृष्टि लोकांच्या मन्दिरांचा येथें फार आदर होतो.” १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ Buddhist Records, i.pp. 150-158 ).
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
११३. या दंतकथेंत दिलेला अशोकाचा व कनिष्काचा काळ बरोबर नाहीं. अशोकाचा राज्यभिषेक बुद्धपरिनिर्वाणानंतर महावंसाप्रमाणें २१८ वर्षांनी झाला; व पाश्चात्य ग्रंथकारांच्या मताप्रमाणें २१४ वर्षांनी झाला. परन्तु कोणाच्याहि मतें तो बुद्धपरिनिर्वाणानन्तर शंभर वर्षांनी झाला नाहीं. कनिष्काचा काळ बुद्धानंतर सातव्या शतकांत ठरतो. तेव्हां ह्युएन् त्संगचीं ही विधानें चुकलेलीं आहेत यांत शंका नाहीं. दुसरी गोष्ट माध्यान्तिक स्थविर आनन्दाचा शिष्य नसून अशोकसमकालीन होता. त्याला अशोकाच्या कारकीर्दीत मोग्गलिपुत्त तिस्स यानें काश्मीर आणि गांधार प्रदेशांत पाठविल्याचा दाखला महावंसांत सांपडतो;१  आणि तोच बरोबर असला पाहिजे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ थेरं कस्मीरगन्धारं मज्झन्तिकमपेसयि । महावंस १२ । ३ .)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel