२७. विश्वासघातकी राजा.

(सच्चंकिर जातक नं. ७३)

काशीच्या राजाला एक मुलगा झाला. लहानपणीं तो हूड असल्यामुळें त्याला दुष्टकुमार हेंच नांव पडलें. राजवाड्यांतल्या सर्व नोकरांना तसाच नगरवासी लोकांना तो फार त्रास देत असे. त्यामुळें सर्वांनीं डोळ्यांतील खड्याप्रमाणें किंवा आपणाला खाण्यास आलेल्या पिशाच्याप्रमाणें तो अप्रिय झाला होता. एके दिवशीं तो आपल्या नोकराबरोबर जलक्रीडा करण्यासाठी नदीवर गेला. त्याचवेळीं एकाएकीं मोठा पाऊस पडण्यास सुरूवात झाली. सर्व प्रदेशांत अंधकार पसरला. तेव्हां तो आपल्या नोकराला म्हणाला ''मला या वेळीं नदींत उतरण्यास मदत करा'' त्यांनीं त्याला नदींत नेऊन पूर आला असतां तेथेंच टाकून दिलें, व ते म्हणाले, ''असल्या पापी माणसाला येथें सोडून दिलें तर राजाला त्याची बातमी देखील समजावयाची नाहीं. अरे दरिद्री पोरा, तुझ्या कर्माप्रमाणें तूं जा.'' नदीवरून परत आल्यावर त्यांना ''आपला मुलगा कोठें आहे'' असा प्रश्न केला. तेव्हां ते म्हणाले, ''महाराज महामेघामुळें आम्हाला कांही दिसेनासें झालें, व आमच्यापूर्वीच नदींतून वर निघून कुमार वाड्यांत आला असावा अशा समजुतीनें आम्हीं मागोमाग धांवत धांवत आलों. पण येथें पहातों तों कुमाराचा पत्ता नाहीं.'' राजा परिवारासह नदीतीरी गेला व त्यानें तेथें कुमाराचा पुष्कळ शोध केला; पण व्यर्थ ! त्याचा मुळींच पत्ता लागला नाहीं.

इकडे तो राजकुमार पुरांत सांपडून वहात चालला असतां नदींतून येणारें एक झाड त्याच्या हातीं आलें. त्याच्यावर बसून मरणाच्या भयानें आरडत ओरडत तो तसाच नदीच्या ओघानें वहात चालला होता. त्याच नदीच्या कांठी एक सर्प रहात असे. त्याचा पूर्वजन्मींचा इतिहास असा होता कीं, तो एक धनाढ्य व्यापारी होता, व त्यानें चाळीस कोटी कार्षापण जमिनींत पुरून ठेविले होते. त्या धनलोभामुळें या जन्मी साप होऊन तेथे रहात होता. आणखी एक दुसरा व्यापारी त्याच नदीच्या कांठी तीस कोटी कार्षापण पुरून ठेवून या जन्मीं उंदीर झाला होता, व तो त्या ठेव्यावर आपलें बीळ करून रहात होता. त्या दोन्ही प्राण्यांच्या बिळांत पाणी शिरल्यामुळें ते बाहेर पडले, व नदीच्या पुरांत सांपडून वहात चालले. राजकुमार बसलेल्या झाडाचा त्यांनांहि आश्रय मिळाला. त्या दोघांनीं त्या झाडाच्या दोन टोकांवर आरोहण केलें. तिसरा एक पोपट त्याच नदीकाठी सांवरीच्या झाडावर घरटें करून रहात असे. नदीच्या वेगानें तो वृक्ष उन्मळून नदींत पडला, व बिचार्‍या पोपटाचें घरटें नदींत बुडालें. पोपट कसाबसा आपल्या घरट्यांतून बाहेर निघाला; पण पाण्यानें पंख भिजल्यामुळें व पाण्यांत गुदमरल्यामुळें त्याला उडतां येईना. राजकुमार बसलेलें झाड वहात येत असतां जीव रक्षणाच्या कामीं त्यालाहि उपयोगीं पडलें. तो एका लहानशा फांदीवर बसून राहिला.

आमचा बोधिसत्त्व त्याकाली औदिच्य ब्राह्मण कुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर प्रपंचांत दोष दिसून आल्यामुळें गृहस्थाश्रम न स्वीकारितां त्यानें अरण्यवास पत्करिला. याच नदीच्या कांठीं तो आपला आश्रम बांधून रहात असे. मध्यरात्रींच्या सुमारास राजपुत्राचा आक्रोश ऐकून बोधिसत्त्वाला त्याची कींव आली, व तो म्हणाला, ''हे पुरुषा, तूं रडूं नकोस. मी या संकटांतून तुला पार पाडतों.'' बोधिसत्त्व पोहण्यांत अत्यंत पटाईत होता. त्यानें त्या महापुरांत उडी टाकून राजपुत्राला झाडासकट तीरावर आणलें. व पहातो तों त्याला त्या झाडावर असलेले सर्पादिक तीन प्राणी आढळले. राजपुत्राला आणि त्या प्राण्यांना त्यानें आपल्या आश्रमांत नेलें. ते सगळे हवेनें व पावसानें गारठून गेले होते. त्यांच्या अंगी मुळींच त्रास राहिलें नव्हतें. त्यांतल्या त्यांत राजकुमाराला इतरांइतकी इजा झाली नव्हती म्हणून तापसानें प्रथमतः त्या मुक्या प्राण्यांस आपल्या अग्निकुंडाजवळ नेऊन ठेविलें व नंतर राजकुमाराला आपल्या वस्त्रांनीं पुसून काढून दुसरी वस्त्रे परिधान करण्यास देऊन आगीजवळ बसविलें. पुढें त्यांच्या अंगीं थोडी ताकत आल्यावर साप, उंदीर आणि पोपट या तिघांना त्यानें थोडें थोडें खाऊं घातलें, व नंतर राजकुमाराला आश्रमांत असलेले फलमूलादिक जिन्नस खावयास दिले. पण हें त्याचें कृत्य राजकुमारास मुळीच आवडलें नाहीं. तो मनांतल्या मनांत म्हणाला, ''हा तापस अत्यंत नीच आहे. मी या प्रदेशाच्या राजाचा मुलगा असून माझा समाचार प्रथमतः न घेतां, हा क्षुद्र प्राण्यांची शुश्रूषा करीत आहे. या मूर्खाला माझी योग्यता मुळींच समजत नाहीं. यदाकदाचित् मी वाराणशीचा राजा झालों, तर या जोगड्याचा चांगला समाचार घेतल्यावांचून राहणार नाहीं.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel