याच काळात (इ.स. १६६९ ) महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्दीकडे नजर टाकली. खरं म्हणजे त्यांची क्रुद्ध नजर सिद्दीवर प्रारंभापासूनच वटारलेली होती. हे जंजिऱ्याचे सिद्दी म्हणजे मूळचे आफ्रिकेतील अॅबिसेनियन. यांनाच हबशी म्हणत. वास्तविक हे भारतात आले नाहीत. गुलाम म्हणून व्यापारी लोकांनी त्यांना आणले. गुलामांचा व्यापार हा त्याकाळी सगळीकडेच तेजीत होता. या हबशी गुलामांची शरीरप्रकृती लोखंडासारखी भक्कम होती. त्यांचा रंग काळाभोर होता. महाराज आणि मराठी माणसं या हबश्यांना श्यामल म्हणत. हे सिद्दी केवळ गुलामगिरी करीत जगले नाहीत , तर युद्धातही जबर पराक्रम गाजविण्याची आपली शक्ती आणि कुशलता त्यांनी दाखवून दिली. दक्षिणेतल्या बहामनी , आदिलशाही कुतुबशाही , निजामशाही आणि दिल्लीच्या मोगलशाही सुलतानांच्या पदरी या हबश्यांनी लष्करात कामगिऱ्या करून दाखविल्या.

अहमदनगरच्या निजामशाही राज्यात एक जबरदस्त सिद्दी व्यादाचा फजीर् झालेला आपल्याला ठाऊक आहे. तो म्हणजे मलिक अंबर सिद्दी. हा प्रारंभी असाच गुलाम पोरगा होता. पण आपल्या कर्तृत्त्वाने तो निजामशाहीचा केवळ वजीरच नव्हे , केवळ सेनापतीच नव्हे , केवळ राज्यकारभारी प्रशासकही नव्हे तर नगरचा सवेर्सर्वा ठरला. महाराष्ट्राचा गनिमी कावा पुन्हा एकदा उजळून काढला तो या मलिकने. दिल्ली सल्तनतीला म्हणजेच जहागीरच्या फौजांना जबर तडाखे देऊन निजामशाही टिकविणारा हा मलिक अंबर गनिमी काव्याचा प्राचार्य वाटतो. शहाजीराजे भोसले हे एक उत्कृष्ट सेनापती म्हणून ( इ. १६१० पासून पुढे) गाजू लागले , ते याच मलिक अंबरच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्रातून तरबेज होऊनच. भातवडीची लढाई (इ. १६२४ ऑक्टोबर) शहाजी राजांनी शर्थ करून जिंकली. जहांगिरी आणि आदिलशाही यांच्या प्रचंड जोडफौजेचा एकाच युद्धात शहाजीराजांनी फडशा उडविला. यावेळी रणांगणावर मलिक अंबरने स्वत: भाग घेतला नव्हता. सर्व जोखीम त्याने शहाजीराजांवर टाकली होती. प्रचंड जय मिळाला. कोणाला ? खरं म्हणजे शहाजीराजांना. मराठ्यांना. पण श्रेय मिळाले मलिक अंबरला. मिळेना का! तो वजीरच होता ना. पण शहाजीराजे , म्हणजेच एक मराठा , एवढ्या झपाट्याने अस्मानात झळाळू लागल्याचे सहन होईना याच मलिक अंबरला. भोसल्यांचा मत्सर करू लागला. निजामशाहीतील आपल्याच हाताखालील मराठी सरदारांत भेद पाडू लागला.

पुढे या साऱ्या सुलतानी आणि हबशी राजकारणातून अचूक बोध घेतला , उगवत्या शिवाजीराजांनी! अगदी इ.स. १६४७ पासून महाराजांनी आपली पावलं अगदी अचूक टाकली ती आधीच्या इतिहासातून बोध घेऊन. एक निष्कर्ष महाराजांचा नक्कीच होता की , हे सिद्दी बेभरवशाचे आहेत.

मुरुडच्या सागरी किनाऱ्याजवळ बेटावर असलेला जंजिरा अशाच सिद्दी हबश्यांच्या पूर्ण स्वतंत्र सत्तेखाली होता. हे हबशी कामापुरते स्वत:ला निजामशाहीचे किंवा जरूर तेव्हा दिल्ली बादशहाचेही सेवक म्हणवून घेत. पण जंजिऱ्याच्या सिद्दींची प्रवृत्ती पूर्णपणे सार्वभौम महत्त्वाकांक्षेची होती. एका बेटावरती असलेलं तळहाताएवढं हे हबशी राज्य विलक्षण चिकाटीने आणि क्रूर जरबेने त्यांनी सांभाळलं होतं. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या किनारी भूमीवर आपल्या हबशी राज्याचा अंमल बसविण्याचा , म्हणजेच उगवत्या हिंदवी स्वराज्याला कोकणात कडवा विरोध सतत करण्याचा सिद्दीचा अखंड उद्योग चालू होता.

महाराज या ‘ श्यामला ‘ च्या दंगेखोरीमुळे कायमचे अस्वस्थ झालेले होते.

‘ हा जंजिऱ्याचा सिद्दी म्हणजे आमच्या (मराठी) दौलतीस लागलेला पाण्यातील उंदीर आहे ‘ असे ते म्हणत.

अगदी इ.स. १६५७ पासून सतत पुढे या हबश्यांच्या विरुद्ध महाराज लढाया करीत राहिले. पण आपल्या जंजिरा किल्ल्याच्या आणि आरमाराच्या बळावर सिद्दी कायमचाच झुंजत राहिला. बेटावरील हा किल्ला बळकट आहे. याचे बळ केवळ तटाबुरुजांच्या बलाढ्य बांधणीत नाही ; तर ते भोवती पसरलेल्या अथांग समुदामुळे आहे , हे महाराजांच्या केव्हाच लक्षात आलेले होते. पण हा पाण्यात डुंबत असलेला पाणकोट जंजिरा जिंकणे हे खरोखर जिकीरीचे काम होते. स्पेन , फ्रान्स किंवा अन्यही युरोपियन राष्ट्रांना अगदी थेट नेपोलियनपर्यंत जसे ब्रिटिश बेटांचे विरुद्ध विजय मिळविता आले नाहीत , अगदी तसेच या मुरुड जंजिऱ्याच्या बेटांविरुद्ध महाराजांना आणि पुढे शंभू छत्रपतींनाही यश मिळू शकले नाही.

केवळ समुद हीच या मुरुड जंजिऱ्याची ताकद होती काय ? त्याहीपेक्षा जबरदस्त ताकद या मुरुड जंजिऱ्यात असलेल्या हबशी लोकांच्या अतूट ऐक्यात होती. हे त्यांचे आपसातील ऐक्य आणि आपल्या नेत्यावरील त्यांची निष्ठा एवढी जबरदस्त होती की , या किल्ल्यात मराठ्यांचा कधीही चंचूप्रवेशही होऊ शकला नाही.

पुढच्याच काळातील एक गोष्ट सांगता येईल. इ.स. १७ 3 ७ मध्ये चिमाजीअप्पा पेशवे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांची जंजिऱ्याविरुद्ध मोहिम सुरू झाली. उरण येथे फार मोठी लढाई झाली. त्यात मराठ्यांनी जंजिऱ्याचा मुख्य नेता (सुलतान म्हटले तरी चालेल) सिद्दी सात याला युद्धात ठार मारले. नेता पडला. पण पाण्यातला जंजिरा तसाच झुंजत राहिला. हे एकीचे , शिस्तीचे आणि अनुशासनाचे बळ आहे.

महाराज जंजिऱ्यावरील मोहीम आताही मांडीत होते. (इ. १६६९ ) जंजिऱ्याचे तीन सिद्दी एकवटून प्रतिकारास उभे होते. सिद्दी कासम , सिद्दी खैरत आणि सिद्दी संबूळ ही त्यांची नावे.

- बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel