आज आपल्या समाजात धडे व मुंडकी दूर दूर पडलेली आहेत. धडाला मुंडके नाही व मुंडक्याला धड नाही! समाज-पुरुष असा मरून पडला आहे. बुद्धिजीवी लोक, डोकेबाज लोक श्रमजीवी माणसाची कदर करीत नाहीत. परंतु हे मुंडके धडाजवळ गेल्याशिवाय राष्ट्रात जिवंतपणा उत्पन्न होणार नाही. श्रमजीवी, बुद्धिजीवी एकत्र येऊ देत. बुद्धिवादी श्रम करू देत व श्रमणा-याला विचाराचा आनंद मिळू दे, असे होईल तो सुदिन.

भारतीय संस्कृती कर्ममय आहे. कर्माला प्राधान्य देणारी ही संस्कृती आहे. या संस्कृतीला आळस खपत नाही. या संस्कृतीस कोणतेही सेवाकर्म तुच्छ नाही. कर्माचा महिमा भारतीय संस्कृतीत किती वाढविलेला आहे हे जरा पाहा तरी. ती ती कर्माची साधनेसुद्धा आपण पवित्र मानली आहेत. साधनेसुद्धा पवित्र, मग ते कर्म किती पवित्र असेल?

बायका केरसुणीला पाय लावू देत नाहीत, जात्याला पाय लावू देत नाहीत, चुलीला पाय लावू देत नाहीत, याचा अर्थ काय? बायकांची ही सेवासाधने आहेत. केर काढून, दळून, स्वयंपाक करून त्या सेवा करतात. त्या सेवेने त्या मुक्त होतात. त्यांच्या मोक्षप्राप्तीची साधने म्हणजे ती केरसुणी व ती चूल. केरसुणीला पाय लावणे म्हणजे पाप, ही गोष्ट ज्या संस्कृतीने शिकविली, त्या संस्कृतीच्या भक्तांनी व उपासकांनी केर काढण्याचे काम तुच्छ मानावे, झाडूवाल्याला पतित समजावे, हीन मानावे, ही केवढी खेदाची गोष्ट!

शेतकरी नांगराला पाय लावणार नाही. पंडित पुस्तकास पाय लावणार नाही. चांभार आपल्या दारावर कातड्याच्या तुकड्यांचे तोरण लावील. महार हाडे दारावर लावील. यात महान अर्थ आहे. ते ते सेवाकर्म पवित्र आहे. ब्राह्मण समाजाची सेवा ज्ञानदानाने करीत असेल, तर सेवासाधन जे पुस्तक ते तो स्वत: पवित्र मानील; आणि इतरही त्याचे ते सेवासाधन तुच्छ मानणार नाहीत. महार-चांभार मृत ढोरे फाडून समाजाची सेवा करीत असतील, तर ती हाडे, ती चर्मे पवित्र आहेत. त्यातून ते संपत्ती निर्माण करीत आहेत. स्मशानात शिव राहतो व त्याच्या गळ्यात हाडांचे अलंकार आहेत. महार-चांभार म्हणजेच शिवशंकराची मूर्ती होय.

महाभारतात अर्जुनाला गांडीव धनुष्याची निंदा सहन होत नसे, अशी गोष्ट आहे. गांडीवाची निंदा करणा-या धर्मराजासही मारावयास तो धावला. अर्जुनाला गांडीव इतके प्रिय व पवित्र का वाटे? कारण ते त्याचे सेवासाधन होते. समाजाचे दुष्टांपासून संरक्षण करण्याचे, दीनदुबळ्यांचे संरक्षण करण्याचे ते धनुष्य साधन होते त्याची निंदा अर्जुनाला सहन होणार नाही.

ती ती सेवासाधनेही पवित्र आहेत. मग ती कर्मे पवित्र नाहीत का? लेखणी असो वा तलवार असो, तराजू असो वा नांगर असो, चूल असो किंवा झाडू असो, आरी असो की वस्तरा असो, ही सारी सेवासाधने भारतीय संस्कृती पवित्र मानील.

सेवेच्या साधनांची कितीतरी काळजी घेण्याबद्दल सांगितले आहे. सेवासाधने सदैव स्वच्छ ठेवावीत, नाहीतर सेवा उत्कृष्ट करता येणार नाही. पंडिताजवळची पुस्तके नीट व्यवस्थित असावीत. वीराजवळ शस्त्रे घासून-पुसून ठेवलेली असावीत. चूल सारवलेली असावी. कोयता, विळा धार लावलेले असावेत. सेवेची साधने नीट न ठेवली तर उत्कृष्ट सेवा करता येणार नाही.

परंतु येथे एक गोष्ट सांगाविशी वाटते. मनुष्य सेवासाधन काळजीपूर्वक वापरतो, परंतु क्ही साधनांकडे तो दुर्लक्ष करतो. सेवासाधने दोन प्रकारची आहेत: सजीव व निर्जीव.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel