भारतीय स्त्रिया ध्येये पाळणा-या आहेत. समाजात जी जी नवीन ध्येये उत्पन्न होतील ती ती स्त्रियांपर्यंत गेली पाहिजेत. तरच ती अमर होतील. गायीचे माहात्म्य भारतात उत्पन्न झाले, स्त्रियांनी ते टिकविले. शुचिर्भूतपणाचे तत्त्व उत्पन्न झाले, त्यांनी ते पराकोटीला नेले. पातिव्रत्याचे ध्येय निघाले, त्यात पराकाष्ठा केली. दारात कोणीही येवो, त्याला मूठभर दाणे घातल्याशिवाय त्या राहणार नाहीत. “कोणी देवही असेल रूप घेऊन आलेला!” असे त्या म्हणतील. एकीकडे शुचिर्भूतपणाच्या ध्येयामुळे सोवळेपणाची कमाल, तर दुसरीकडे देव सर्वत्र आहे या तत्वाचा- कोणीही दारात येवो त्याला मूठभर द्या, असे म्हणण्यात प्रत्यक्ष आचार. एकादशी वगैरे उपवास त्यांनीच ठेविले आहे. नदीवर स्नानास जाणे, यात्रा करणे यांची त्यांनाच हौस असते.

स्त्रिया ध्येये कदाचित निर्माण करणार नाहीत, परंतु ती निर्माण झाली की त्यांना मरूही देणार नाहीत. ज्याप्रमाणे पुरुष बाहेरून धान्य वगैरे माल आणतो, परंतु घरात तो सांभाळणे, तो सांडू न देणे, घाण होऊन देणे हे स्त्रियांचे काम असते, त्याप्रमाणे समाजात जी जी ध्येये निर्माण होतील ती ती मरू न देणे हे स्त्रियांचे काम असते. मुले आजारी पडली तर सांभाळणे हे मुख्यत्वे त्यांचेच काम; तद्वत ध्येयबाळेही सुरक्षित ठेवणे हे त्यांचेच काम.

पुरुष पोटच्या पोरांची उपेक्षा करील, परंतु स्त्री करणार नाही. त्याप्रमाणेच पुरुषांनी केलेली ध्येये पुरुष सोडू पाहील, परंतु स्त्री सोडणार नाही. श्रियाळ राजा आयत्या वेळेस अतिथीबरोबर जेवावयास कुरकुरतो. त्याला धैर्य होत नाही. परंतु पतीचा हात धरून चांगुणा त्याला बसविते. ती ध्येयबाळाला मरू देणार नाही.

भारतीय स्त्रियांचा हा महान विशेष आहे. आणि तो लक्षात घेतला पाहिजे. जी जी नवीन ध्येये आज उत्पन्न होत आहेत ती ती स्त्रियांपर्यंत गेली पाहिजेत, तरच ती टिकतील. हरिजनसेवा, ग्रामोद्योग, खादी, स्वदेशी इत्यादी नवीन व्रते, हा नवीन दयामय व प्रेममय धर्म, हा सेवाधर्म त्यांच्या हृदयापर्यंत गेला पाहिजे. स्त्रियांच्या पेटीत जे जाईल ते नष्ट होणार नाही.

म्हणून माता या दृष्टीनेच भारतीय स्त्रियांचा अपार महिमा. त्या सांभाळणा-या आहेत. मुले सांभाळणा-या, पतीला सांभाळणा-या, ध्येयांना सांभाळणा-या! त्या कोणाला मरू देणार नाहीत. त्या सर्वांना प्रेम देतील, आशीर्वाद देतील, सेवा देतील. ईश्वराचेच रूप! ईश्वराला भक्तांनी माता हाच शब्द योजिला आहे. कारण ईश्वराचेच जे हे सांभाळण्याचे मुख्य कर्म. सर्वांवर पांघरूण घालण्याचे कर्म. ते या जगात माता करीत असतात. ईश्वराला आई म्हणून हाक मारणे याहून दुसरी थोर हाक नाही-अन्वर्थक हाक नाही! ईश्वराच्या प्रेमाची कल्पना आणून देणारी जर कोणती वस्तू असेल तर ही माता होय.

म्हणून भारतीय संस्कृती सर्वत्र मातृवंदन करीत आहे. उपनिषदांतील आचार्य ऐहिक देवतांची नावे सांगताना, प्रत्यक्ष संसारातील देवतांची नावे सांगताना प्रथम ‘मातृदेवो भव’ असे सांगतो. आधी माता, मग पिता. पति-पत्नींमध्ये आधी पती आहे. परंतु आई-बापांमध्ये आधी आई आहे! पतीला पिता व्हावयाचे आहे, पत्नीला माता व्हावयाचे आहे. आणि या दोन स्वरूपांत माता हे उदात्ततर, श्रेष्ठतर स्वरूप होय.

म्हणून शेवटी भारतीय संस्कृती मातृप्रधान संस्कृती आहे. मातेला तीन प्रदक्षिणा घालणे म्हणजे म्हणजे सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे होय. आईबापांची सेवा करणे म्हणजे मोक्ष मिळविणे. “न मातु: परदैवतम्” – आईविना दैवत नाही. आईचे ऋण कधी फिटत नाही.

विठ्ठल म्हणजे आई, भारत म्हणजे आई, गाय म्हणजे आई,! भारतवर्षात सर्वत्र मातेचा महिमा आहे. आईला आधी वंदन. कोणताही मंगल विधी असो आधी आईचा आशीर्वाद, तिला नमस्कार.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel