एके दिवशी असाच मी तेथे जाऊन बसलो होतो. पावसाळयाचे दिवस होते. पाऊस पडत होता. समोरच्या पारिजातकाच्या झाडावरून टपटप पाणी गळत होते. पन्नयांवर पावसाचा सडसड आवाज होत होता, माझ्याही डोळयांतून पाणी गळत होते; परंतु त्याचा आवाज होत नव्हता. तो मुका पाऊस होता. मला सारी मुले शोधीत होती. रामही मला शोधू लागला. शेवटी त्या जिन्यात बसलेला श्याम रामला आढळला.

''काय रे श्याम, तिथे बसून काय करीत आहेस?'' रामने विचारले.

परंतु मी काहीच उत्तर दिले नाही. माझे डोळे अधिकच भरून आले. निराधार झाल्याप्रमाणे जणू मला झाले होते. राम माझ्याजवळ आला व म्हणाला, ''श्याम, काय रे झालं? आईची का आठवण आली? तुला कुणी बोललं का? तुझा कुणी अपमान केला का? सांग ना रे.''

''काय सांगू राम? माझा मन मला रडवीत आहे. माझी पूजाअर्चा मला रडवीत आहे. अपमानाने मी कधी रडलो नाही, इतका ह्या मानाने मी रडत आहे,'' मी म्हटले.

''काय म्हणतोस, ते मला काही एक समजत नाही,'' राम म्हणाला.
''राम, तू मला 'देव' का म्हणतोस? तूच ना म्हणत असस, की प्रेम हृदयात ठेवावं? श्यामबद्दलच्या तुझ्या सा-या भावना हृदयात ठेव. तू मला 'देव' म्हणतोस, म्हणून मी रडत आहे. दगडाला देव का म्हणतात, ते आज मला समजलं. मी दगड आहे. अनंत दोष माझ्यामध्ये आहेत. का उगीच मला 'देव, देव' म्हणतोस? मला साधी श्याम अशी हाक मार. तू 'देव' म्हणू लागलास, दुसरी 'स्वामी' म्हणू लागली! मी कशाचा आहे स्वामी ? ना धनाचा, ना ज्ञानाचा; ना मनाचा, ना इन्द्रियांचा; ना वासनांचा, ना विकारांचा, मी एक किडा आहे. ह्या किडयातून अनंत रंगांचं फुलपाखरू कधी बाहेर पडेल ते पडेल; परंतु अनंत आकाशात उडण्याचे पंख मला फुटण्यापूर्वी, अनंत वेळा मला टोचून घ्यावं लागेल, यमयातनांतून जावं लागेल? मी एक सरपटणारा सरडा आहे. क्षणात माझे रंग बदलतात, बेत बदलतात. असा मी चंचल आहे. मला देव म्हणणं, म्हणजे त्या शब्दाचा अपमान आहे. तो माझा अपमान आहे. राम, मला रडवू नका. माझ्याजवळ भरपूर अश्रू आधीच आहेत. तुम्ही त्यांत आणखी भर नका घालू.'' असे म्हणून रामच्या हातावर मी माझे डोके टेकले. त्याच्या करकमलावर मी माझ्या अश्रूंचे अर्घ्य घातले. त्याच्या हातावर माझे अश्रू ओतून, मी भीक मागितली.

राम गंभीरपणे निघून गेला. मी तेथेच गळून गेल्यासारखा बसलो होतो. रामने आपल्या भावडांनाही समजावून सांगितले, असे दिसले; कारण मग ती फारशी माझ्या पाठीस लागेनाशी झाली.
''स्वामींना फार नाही रे त्रास द्यायचा. दिवसातून फक्त दोन वेळां त्याच्या पाया पडायचं.'' मालण हसत म्हणाली.
''फार त्रास दिला तर रडतील हो ते,'' बाळू म्हणाला.
''मग ते जिन्यात जाऊन बसतील हो,''बापू म्हणाला.
''तिथे त्यांना मग विंचूबिंचू चावायचा हो,'' शेजारचा राजा म्हणाला.

मला पाहून त्यांचे असे हास्यगर्भ बोलणे चालायचे आणि माझ्या खित्र चेह-यावरही हसू उमटायचे!

रामच्या आईचे कधी कधी फारच पोट दुखे. शेवटी एकदा ससून हॉस्पिटलमध्ये परीक्षा करण्यात आली. तेथील औषध सुरू झाले. ते औषध मी घेऊन येत असे. दहाच्या आधी तेथे औषध मिळत नसे. सव्वादहा-साडेदहाच्या सुमारास औषध मिळे. मी पळत पळत औषध घेऊन घरी येत असे. औषध देऊन मग वारावर जायचे. माझे वारच फारसे नव्हते, म्हणून बरे असे. ते औषध आणायचे काम मी आनंदाने करीत असे. ती कृतज्ञता होती. कृतज्ञतापूर्वक केलेल्या कामाचा कधी शीण वाटत नाही, त्रास वाटत नाही, ओझे वाटत नाही. कृतज्ञतेचा स्पर्श होताच प्रचंड भार फुलांसारखे वाटतात, काटयांची मखमल होते, रखरखलेल्या वाळवंटाची सुंदर हिरवळ होते. कृतज्ञता म्हणजे एक जादू आहे. कृतज्ञता म्हणजे कृष्णाची वेणू आहे.

प्रेम द्यावे नि प्रेम घ्यावे, हा सनातन नियम आहे. रामची सारी भावंडे, त्याची आई मला प्रेम देत होती. मी त्यांचा प्रेमळ सेवक झालो होतो. माझे दिवस आनंदात जात होते. प्रेमसेवेत जात होते. माझे जीवन रसमय होत होते. माझ्या जीवनाचा थोडाबहुत आंतरिक विकास होत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel