गाडीला एंजिन लागले. नामदेवाला धक्का बसला. स्वामींनी एकदम धरले.

“नांमदेव सावध राहत जा. पडायचास हे असा,” स्वामी म्हणाले.

“तुम्ही धरायला असा म्हणजे पडणार नाही,” नामदेव म्हणाला.

“नामा, पत्र पाठव. रायबांना प्रणाम,” रघुनाथ म्हणाला.

“तुम्ही आले असतेत तर रायबांना किती आनंद झाला असता. आपण दोघे गेलो असतो. येता अजून ?” नामदेवाने स्वामींना विचारले.

“नको. प्रचारकांबरोबक हिंडणार आहे. या पायांना पंख फुटत आहेत. हिंडण्याची स्फूर्ति येत आहे. वसंत ऋतूत पल्लव फुटतात, त्याप्रमाणे मला प्रेरणेचे पल्लव फुटत आहेत. हिंडू दे भिरिभिरि सर्वत्र. वाढू दे चैतन्य ! आश्रमांतील वारे सर्वत्र जावोत,” स्वामी म्हणाले.

“हात बरा झाला की रे तुझा?” रघुनाथने विचारले,

“वेणूने फुंकर घातला. हात बरा झाला,” हसंत नामदेव म्हणाला.

“वेणू फार थोर मनाची मुलगी आहे. मी इतकी चांगली आहे याचे तिला भानही नाही. यामुळे तर ती अधिकच गोड वाटते तिच्या बुद्धीचे व हृद्याचे डोळे फार रमणीय व प्रसन्न आहेत. कसे एखादे वेळेस बोलते !” स्वामी म्हणाले.

गाडी निघाली व नामदेव गेला.

“रघुनाथ, तू आश्रमांत जा. भिका, जानकू यांच्याबरोबर रात्री वचीत जा. त्यांची ज्ञानाची तहान मारू नको. विचारांची भांडवलशाही नको,” स्वामी म्हणाले.

“वाचीन. मी त्यांच्याबरोबर खूप बोलतो. मीहि मागावर बसतो. त्यांच्याशी एकरूप होतो,” रघुनाथ म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel