त्याची कृपा असावी म्हणून पूजा, प्रार्थना, देणग्या यांची लांच त्याला सुरू झाली.  या प्रबळ व भयंकर दूताला संतुष्ट ठेविलें पाहिजे.  हा प्रेतात्माच प्रचंड वादळाचे वेळीं कडाडतो, गरजतो ; ज्वालामुखींच्या रूपानें त्याचाच क्रोधाग्नि प्रकट होतो ; ज्यांच्यावर त्याची अवकृपा होते, त्यांच्यावर रोगांची, मृत्यूंची कृपा होते ; नवीन जन्मणार्‍या मुलांमध्यें प्राण तोच घालतो. (त्या आदिमानवाला लैंगिक संबंधापासून नवीन जीव जन्माला येतो याची अर्थातच अजिबात कल्पना नव्हती.) हा जो शक्तिमय, छायामय प्रेतात्मा त्याच्या ताब्यांत आणखी एक अपूर्व अशी गोष्ट होती.  हवेंत तरंगणारी अशी ही गूढ रहस्यमय वस्तु होती.  तिचें नांव दैव.  हें दैव कधीं हात देई तर कधीं दूर लोटी.  तुम्ही व तुमचे मित्र एके दिवशीं युध्दाला गेलांत.  तुमचा मित्र मारला गेला आणि तुम्ही वांचलेत.  कां ?  तुम्ही कांहीतरी महत्त्वाची अशी एक गोष्ट केली असावी, कीं जी तुमच्या मित्रानें केली नाहीं.  परंतु हें तुम्ही कसें सांगणारं, तुम्हांला काय माहीत ?  कांही शहाणे लोक पुढें आले.  त्यांनीं या गोष्टीचा शोधबोध करण्याचें ठरविलें.  ते दैवज्ञ झाले.  ते धर्मोपाध्याय झाले.  मंत्रज्ञ झाले.  ते छायात्मे, तो तुमचा देव, त्याची कृपा व्हावी व त्याची अवकृपा टळावी म्हणून काय करावें, काय करूं नये तें तें सांगू लागले.  असें केल्यानें तुमच्या सुदैवाचा भाग तुम्हांस मिळेल असें ते सांगत. या धर्मोपाध्यायांची आज्ञा सदैवी मानलीच पाहिजे. आज्ञाभंग कराल तर मरण्याची किंमत द्यावी लागेल !

त्या प्राचीन जगांत अशा कांहींतरी प्रकारानें धर्म अस्तित्वांत आला.  पहिले देव म्हणजे मृत नायकांचे प्रेतात्मे असत.  अशा रीतीनें आरंभीं मानवानें ईश्वर निर्मिला.  त्यानें स्वत:च्यासारखाच हा ईश्वर निर्मिला.  आणि असा हा ईश्वर निर्मून त्याच्यासमोर तो लोटांगण घालूं लागला.  आपल्या या देवासमोर जो कोणी गुढगे टेंकणार नाहीं त्याला तो ठार करी.

ईश्वराचा शोध लागल्यानें कांही दुष्ट गोष्टी सुरू झाल्या.  परंतु या शोधाबरोबर कांही भलेंहि जन्मलें.  मनुष्यांतील कलात्मकतेचा जन्म याच वेळेस झाला.  धर्माच्या पाठोपाठ कला आली.  सुदैवाचा संपूर्ण वांटा मिळावा म्हणून, विशेषत: शिकार चांगली सांपडावी म्हणून, जे प्राणी मारण्याची इच्छा त्या आदि मानवाला असे, त्या प्राण्यांची चित्रें तो गुहांच्या तोंडावर काढूं लागला.  भाल्यानें त्या चित्रमय आकृतींना जर दुरून नेम मारतां आला तर शिकारींत यश येईल असें तो समजे. ज्या प्राण्यांच्या त्या आकृती असत, त्या प्राण्यांना मारायला देव आपणांस समर्थ करतील असें तो मानी.  आकृति जितकी हुबेहुब असेल, तितका त्या प्राण्याच्या शिकारीचा संभव अधिक.  म्हणून आपल्या कलेंत निर्दोषता यावी यासाठीं तो तासन् तास दवडी.  सुधारणेच्या व संस्कृतीच्या त्या आरंभकाळीं गुहांच्या तोंडांवर रंगवलेलीं तीं चित्रें आजच्या वास्तववादी यथार्थ चित्रांहून फार कमी दर्जाचीं आहेत असें नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel