या क्रांतिकारक विचारांचा मुस्लिम तरुणांवरही परिणाम हात होता.  अलीगढ कॉलेजने या वृत्तिप्रवृत्ती दडपून टाकण्याची खूप खटपट केली.  राष्ट्रीय सभेपासून मुसलमानांस अलग ठेवण्यासाठी आणि त्यांना स्वतंत्रपणे राजकीय प्रचारकार्य करता यावे म्हणून आगाखान व इतर मंडळींनी मुस्लिम लीग स्थापिली.  परंतु अती महत्त्वाची आणि हिंदुस्थानच्या भविष्यकालीन घडामोडींवर अपार परिणामकारक गोष्ट म्हणजे मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आले.  अत:पर मुसलमानांच्या स्वतंत्र मतदारसंघामार्फतच मुसलमानांचे प्रतिनिधी निवडले जाणार आणि मुसलमानांसाठी मुसलमान उमेदवारच असायला हवेत असे ठरविण्यात आले.  मुसलमानांभोवती एक प्रकारचे राजकीय कुंपण घालण्यात आले.  इतर हिंदुस्थानापासून त्यांना अलग करण्यात आले.  शतकानुशतके एकीकरणाची जी गोष्ट घडत येत होती, नवीन यांत्रिक कारखानदारीमुळे जे एकीकरण व्हायला झपाट्याने मदत झाली होती, ते एकीकरण आता कसे होणार ?  ती सारी क्रिया आता विरुध्द दिशेने होऊ लागली.  प्रथम हे राजकीय कुंपण लहान होते, कारण मतदारसंघ लहान होता.  परंतु वाढत्या मतदानसंघाबरोबर हे राजकीय कुंपणही वाढत गेले.  आणि नागरिक आणि सामाजिक जीवनाच्या सर्व रचनेवरच त्याचे परिणाम होऊ लागले.

शरीराला कॅन्सर व्हावा त्याप्रमाणे सार्‍या समाजदेहाचे झाले.  स्थानिक-स्वराज्य खात्यात, म्युनिसिपालिट्यांतून हे विष सर्वत्र भिनले आणि शेवटी तर हास्यास्पद असे भेद दिसून येऊ लागले.  पुढे पुढे स्वतंत्र मुस्लिम ट्रेड युनियन, मुस्लिम विद्यार्थी संघटना होऊ लागल्या.  या सर्व चळवळींत मुसलमान मागासलेले होते.  खालपासून होत आलेल्या या प्राणमय संघटना नव्हत्या, परंतु वरच्या आज्ञेनुसार या अशा सवत्या सुभ्यांच्या संघटना निर्माण करण्यात आल्या आणि जुनाट अर्धवट सरंजामशाही प्रवृत्तीच्या माणसांच्या नेतृत्वाखालीच हे सारे चालू होते.  अशा रीतीने मुस्लिम मध्यमवर्गाला, मुस्लिम बहुजनसमाजासही इतर हिंदुस्थानवर परिणाम करणार्‍या विकासाच्या नवप्रवाहापासून मुद्दाम दूर ठेवण्यात आले.  ब्रिटिश सरकारने भरपूर वतनदारवर्ग निर्माण केला होता, किंवा होता त्याला रक्षिले होते, आता स्वतंत्र मतदारसंघामुळे आणखी एक जबरदस्त वतनदार वर्ग निर्माण करण्यात आला.

हा क्षणिक शाप नव्हता.  वाढत्या राजकीय जाणिवेबरोबर स्वतंत्र मतदारसंघांचे हे भूत जमीनदोस्त होईल ही आशा नव्हती.  सरकारी धोरणाने हा राक्षस वाढतच होता.  त्याने सर्वत्र पाय पसरले, आपले विष सर्वत्र नेले, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कोणताही प्रश्न देशासमोर असो, तेथे तेथे विभागणीचे, स्वतंत्र मतदारसंघाचे हे पिशाच्च येऊन उभे राही.  पूर्वी जेथे द्वेषमत्सर नव्हते तेथे आता द्वेषमत्सर सळसळू लागले आणि सरकारच्या तोंडाकडे पाहण्याची सवय लागल्यामुळे, कृत्रिम आधारावर विसंबून राहण्याची वृत्ती वाढल्यामुळे सरकारच्या कृपेतील या पक्षाची खरी शक्ती वास्तविक कमीच झाली.

शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या जे वर्ग किंवा ज्या अल्पसंख्य जमाती मागे होत्या, त्यांच्या त्या उणिवा दूर करणे, अधिक उदार आणि पुरोगामी असे त्यांच्या बाबतीत शैक्षणिक धोरण अवलंबिणे हा खरा त्यांना पुढे आणण्याचा मार्ग होता.  परंतु मुसलमान किंवा अन्य मागासलेले वर्ग यांच्या बाबतीत असे काही एक करण्यात आले नाही.  ज्यांना अत्यंत जरूर होती त्या दलित वर्गासाठीही सरकारने काही केले नाही.  सर्व बाजूंनी सुधारणा करण्याऐवजी चार दुय्यम नोकर्‍या मिळवण्याभोवतीच सारे विचार फिरू लागले आणि योग्यायोग्यतेचा विचारही करण्यात येत नसे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel