रंगभूमीवरील नटाप्रमाणे-नव्हे, नटांच्या छायेप्रमाणे-या बड्या अधिकार्‍यांनी आपल्या भूमिका जुन्या शिरस्त्याप्रमाणे वठविण्याचे आपले काम पूर्ववत पुढे चालू ठेवले होते.  साम्राज्यशाहीचा थाट म्हणून क्षुल्लक गोष्टीत सुध्दा अघळपघळ विधी, ठिकठिकाणचे दरबार, राजसभेचे, पदव्या देण्याचे, कवायतींचे समारंभ, मेजवान्या, वेगवेगळ्या प्रसंगांचे वेगवेगळे पोषाख, फुकटचा डौल मिरविणारी, तोंड भरभरून केलेली प्रवचने अशा नाना प्रकारे हिंदी लोकांना दिपवून टाकण्याची खटपट पूर्ववत चालूच होती.  हे उत्सव ज्या मंदिरांतून साजरे होत त्यांपैकी सगळ्यात मोठे मंदिर म्हणजे ह्या साम्राज्यासुराचे अर्चकशिरोमणी जेथे त्याची महापूजा बांधीत ते नव्या दिल्लीतील व्हॉइसरॉयांचे राजप्रतिनिधीमंदिर, पण देशात इतरत्रही ठिकठिकाणी लहानमोठी ही मंदिरे व तेथील छोटे मोठे अर्चक होते.  हे सारे उत्सव समारंभ, हे साम्राज्यवैभवाचे प्रदर्शन, यांची मूळ योजना हिंदी लोकांवर छाप बसवावी या हेतूने करण्यात आली होती व जुन्या काळात त्यांची छाप लोकांवर बसलीही, कारण हिंदी लोकांनाही असल्या उत्सवांची, असल्या महापूजा बांधण्याची जात्या आवड आहे.  पण कोठल्याही गोष्टीचे महत्त्व मोजण्याची नवी मापे ह्या नव्या काळात प्रचारात आली होती, व महत्त्व वेगळ्याच गोष्टींना आलेले होते, त्यामुळे आता या अघळपघळ दिखाऊ समारंभांची वेगळ्याच अर्थाने शोभा होऊ लागली, तो एक थट्टामस्करीचा विषय बनला.  हिंदी लोकांबद्दल अशी समजूत आहे की त्यांचे जीवन अगदी संथपणे चालते, त्यांना घाईगर्दी धावपळ होता होईल तोवर नको, पण त्यांच्यात सुध्दा त्वरेने, नेटाने कामे उरकण्याची वृत्ती थोडीफार आली होती, कारण त्यांना आपले कार्य पार पाडण्याची आतुरता लागली होती.  प्रांतांतून काँग्रेसने चालविलेल्या राज्यकारभारात काही चुका असतील नसतील, पण त्यांना आपण काही कार्ये पार पाडावी अशी ओढ होती व तेवढ्याकरिता काँग्रेसचे प्रांतीय मंत्री काही काही जुन्या वहिवाटीकडे दुर्लक्ष करून नेटाने सारखे काम करीत राहिले.  महासंकट पुढे उभे असताना या आणीबाणीच्या प्रसंगीसुध्दा हिंदुस्थान सरकार कसे निष्क्रिय राहिले होते, त्यांचा कारभार किती संथपणे चालला होता ते पाहिले म्हणजे चीड येई.

आणि अशा परिस्थितीत या सुमारास अमेरिकन सरकारचे अधिकारी हिंदुस्थानात आले.  त्यांची सार्‍या गोष्टींत मोठी धावपह चाले, त्यांना कामे हातावेगळी करण्याची मोठी घाई लागलेली, त्यांना हिंदुस्थान सरकारची काम करण्याची रीत व त्यातले निरर्थक सव्यापसव्य यांची काहीही माहिती नव्हती, व ती माहिती करून घेण्याची त्यांना विशेष इच्छाही दिसत नव्हती.  आपल्या कामात व्यत्यय आलेला त्यांना मुळीच खपत नसे त्यामुळे त्यांच्या कामात काही आडवे आले, किंवा सरकारी शिस्तीचे कोणी स्तोम माजवले तर त्याला ते धडक मारून बाजूला सारीत.  नव्या दिल्लीत हिंदुस्थान सरकारचा जीवनक्रम संथपणे चालला होता त्यात त्यांनी घोटाळा उडवून दिला.  विशिष्ट समारंभांना वेगवेगळे वेष सरकारी रीतिरिवाजाप्रमाणे ठरलेले असत, पण ह्या अमेरिकन लोकांनी प्रसंगानुरूप पोशाख करण्याकडेसुध्दा विशेष लक्ष दिले नाही.  सरकारी कामकाजाचा शिरस्ता, व मोठमोठे खलिते लिहिण्याचे काम, याबाबत हिंदुस्थानसरकारने कडक नियम करून ठेवले होते तेही हे अमेरिकन लोक अधूनमधून मोडीत.  सरकारला अमेरिकेकडून मिळणारी मदत जरी बहुमोल असली तरी एकंदरीत ह्या अमेरिकन लोकांच्या वागणुकीमुळे येथील सर्वश्रेष्ठ अधिकारीवर्गाला ते लोक आवडत नव्हते व त्यामुळे उभयतांच्या मनात आढी येऊ लागली.  हिंदी लोकांना मात्र एकंदरीत हे अमेरिकन आवडले.  हिंदुस्थानातील ब्रिटिश अधिकारीवर्गात न आढळणारा गुण म्हणजे हाती घेतलेल्या कामात धडाडीने व उत्साहाने काम उरकणे हा गुण अमेरिकनांच्या अंगात होता, त्यांना काम करताना पाहून इतरांना स्फूरण चढे.  सरकारी अधिकार्‍यांचा घुमेपणा त्यांच्यात नव्हता, त्यांच्या बोलण्यात स्पष्ट व वागण्यात सरळ वृत्ती होती तीही हिंदी लोकांना आवडली.  येथल्या सरकारी अधिकारीवर्गात या नव्या लोकांबद्दल मनोमनी तेढ होती ती पाहून तिची उघड चर्चा जरी लोक करीत नसले तरी त्यांना त्या प्रकाराची गम्मत वाटे व त्याबद्दलच्या कितीतरी खर्‍या वा कल्पित हकीकती वारंवार लोक एकमेकांना सांगत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel