भूतकाळ व अतिदूरस्थ यांचा शोध घ्यायला आम्हा हिंदुस्थानातील लोकांना आपल्या देशाबाहेर, पदेशात जाण्याचे कारण नाही.  आमच्या देशातच ते सारे विपुल भरलेले आहेच.  आम्हाला परदेशी जावे लागते, ते केवळ ह्या वर्तमानयुगाचा शोध घेण्याकरिता.  तो शोध घेणे आवश्यच आहे, कारण वर्तमानयुगापासून आम्ही अलग पडलो तर आम्ही मागासलेले राहू, आमचा र्‍हास होत जाईल. इमर्सनच्या वेळचे जग आता राहिलेले नाही, त्या वेळी देशादेशांना एकमेकापासून विभक्त ठेवणारे बांध आता ढासळून पडत आहेत, जीवनाचे स्वरूप अधिक आंतरराष्ट्रीय होते आहे.  ह्या आगामी आंतरराष्ट्रीय जीवनात आम्हा हिंदवासीयांना आमच्या वाट्याला आलेले काम पार पाडले पाहिजे, आणि त्याकरिता आम्हाला प्रवास केला पाहिजे, इतरांना भेटले पाहिजे, त्यांच्यापासून काही शिकले पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत.  पण खरी आंतरराष्ट्रीय वृत्ती जगात यावयाची असली तर ती काही नुसती हवेत तरंगणारी वस्तू नाही, तिला कोठेतरी मूळ असले पाहिजे, निवार्‍याकरिता आश्रयस्थान पाहिजे.  आंतरराष्ट्रीय वाढीस लागण्याला राष्ट्रीय संस्कृती मुळात पाहिजे, स्वातंत्र्य, समता व खरी आंतरराष्ट्रीय वृत्ती सर्वत्र असली तरच या वर्तमानकालात त्या आंतरराष्ट्रीय वृत्तीची वाढ होईल.  तथापि इमर्सन याने याविषयी जागरूक राहण्याबद्दल केलेली सूचना त्याच्या त्या काळी जितकी सत्य होती तितकीच आजही आहे.  कोठेही आगंतुक म्हणून जाऊ नये, आपल्याच ध्येयाकरिता झटणारे व बरोबरीचे सहकारी म्हणून जेथे आपले स्वागत होणार असेल तेथेच जावे.  असे काही देश आहेत की, जेथे आमच्या देशबांधवांचा अपमान करण्याचा प्रयत्न चालतो, आणि हा प्रकार ब्रिटिश अधिराज्यातील युरोपीय लोकवस्ती असलेल्या देशातून विशेषच आढळतो.  ते देश आम्हाला वर्ज्य आहेत.  परकीय सत्तेचे जोखड आमच्या मानगुटी बसले आहे त्याचे कष्ट भोगणे व त्यामुळे वहावे लागणारे प्रचंड ओझे वाहणे आम्हाला तूर्त प्राप्त असले तरी आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याचा काळ आता दूर राहिला नाही.  आमचा देश म्हणजे काही क: पदार्थ नाही; आम्हाला आमच्या जन्मभूमीचा, आमच्या लोकांचा, आमच्या संस्कृतीचा, आमच्या परंपरेचा अभिमान वाटतो.  मागे होऊन गेलेल्या कोण्या एका कल्पनारम्य भूतकालाला चिकटून राहण्याची आपली इच्छा आहे, तसल्या भूतकालाचा आपण गर्व करू नये, आणि त्या गर्वापायी इतरांपासून तुटक वागण्याची, इतरांच्या भिन्न चालीरीतींत चांगले असेल ते देखील समजून न घेण्याची वृत्ती आपण ठेवू नये.  त्या गर्वापायी आपल्या दुर्बलतेचा, आपल्या अनेक दोषांचा स्वत:ला विसर पडू देऊ नये, ते घालाविण्याची आकांक्षा कमी होऊ देऊ नये.  मानवी संस्कृतीच्या व प्रगतीच्या आघाडीवर चाललेल्या इतरांच्या आपण फार मागे पडलो आहोत, ते अंतर तोडून त्यांना गाठून आपले योग्य ते त्या आघाडीतले स्थान प्राप्त करून घ्यावयाला आपल्याला खूप प्रवास करावयाचा आहे आणि तोही आता घाईने केला पाहिजे, कारण आता आपल्याला फारसा अवधी उरलेला नाही, आणि जगाची गती उत्तरोत्तर वाढत जाते आहे.  हिंदुस्थानची प्राचीन वृत्ती अशी होती की इतर संस्कृतीचे स्वागत करून त्यांना आत्मसात करून सोडावे.  आजतर ती वृत्ती विशेषच अवश्य आहे, कारण जेथे भिन्न भिन्न राष्ट्रीय संस्कृतींचा सार्‍या मानववंशाच्या एकाच आंतरराष्ट्रीय संस्कृतीत संगम व्हावयाचा त्या सारी राष्ट्रे मिळून होणार्‍या उद्याच्या एक जगाकडे आपण चाललो आहोत.  म्हणून, ज्ञान, शहाणपणा, मैत्री, सहकार्य जेथे जेथे लाभण्यासारखे असेल तेथे तेथे आपण त्याचा शोध घेतला पाहिजे, इतरांनी व आपण मिळून करावयाच्या कार्यात त्यांच्याशी सहकार्य ठेवले पाहिजे, पण ते इतरांची आपल्यावर कृपादृष्टी असावी, त्यांनी आपला पुरस्कार करावा अशा याचकवृत्तीने नव्हे.  आपली वृत्ती अशी ठेवली तर आपले खरे भारतीयत्व, आपले आशियाइत्व अबाधित राखूनही आपल्याला चांगले आंतरराष्ट्रीय, जगाचे उत्तम नागरिक बनता येईल.

हिंदुस्थानातील व जगातील माझ्या पिढीच्या लोकांचा काळ मोठ्या यातायातीचा चालला आहे.  हे कार्य आणखी काही काळ आम्ही चालवू, पण आमचे कार्याचे दिवस संपणारच, आणि मग ते कार्य पुढच्या पिढीकडे आम्ही सोपवू.  ती पिढी त्यांचे स्वत:चे जीवन जगणार व हे कार्याचे ओझे पुढच्या टप्प्यापर्यंत वाहून नेणार.  आता संपत चाललेल्या आमच्या पिढीच्या वाट्याला आलेल्या ह्या मध्यंतरीच्या एवढ्याशा काळात आमच्या पिढीने आपली भूमिका कशी काय वठवली असेल ?  ते मला कळत नाही.  पुढच्या काळातल्या पिढीने ते ठरवावयाचे आहे.  आमचे यशापयश मोजायला माप कोणते घ्यावयाचे तेही मला माहीत नाही.  जीवनात आमच्या वाट्याला कष्टच आले असा आक्षेप जीवनाविरुध्द आम्हाला घेता यावयाचा नाही, कारण आमचे आम्हीच होऊन स्वच्छेने तो मार्ग पत्करला, आणि एकंदरीने पाहू गेले तर आमचे जीवन तितकेसे कष्टमय ठरणार नाहीही कदाचित.  कारण, ज्याला जीवन आणि मृत्यू यांच्या सीमारेषेवर उभे राहण्याचे प्रसंग अनेकवार आलेले आहेत, आपले जीवनकर्तव्य आचरताना ज्यांनी मृत्यूची धास्ती कधीच बाळगली नाही, त्यांनाच जीवन म्हणजे काय हे जाणण्याची शक्ती असते.  आमचे कितीही चुकले असले तरी निदान मनाचा क्षुद्रपणा, भेकडपणा, यांचा स्पर्श आम्ही स्वत:च्या मनाला होऊ दिला नाही, आमची आम्हालाच अंतर्यामी लाज वाटावी असे काही केले नाही.  तेव्हा, व्यक्तिश: आमच्यापुरते पाहिले तर आम्ही काही थोडेफार यशच मिळविले आहे. ''मनुष्याला जे काही लाभते त्यात सर्वांत बहुमोल म्हणजे त्याचे जीवन आणि हे आयुष्य त्याला एकदाच काय ते मिळावे असा नेम असल्यामुळे त्याने आपले जीवन असे काही जगावे की आपण मागे कधी क्षुद्रपणाने, भेकडवृत्तीने काही केले अशा जाणिवेने त्याचे कधी मन पोळून निघू नये, काही ध्येये न धरता आपण उगीच एवढी यातायात सोसली असा त्याला पश्चात्ताप होऊ नये.  त्याने आयुष्य असे जगावे की मरताना त्याला स्वत:ला असे म्हणता येईल की, 'माझे सारे जीवन माझी सारी शक्ती या जगातल्या सर्वोत्तम कार्यापायी लागली आहेत—ते कार्य म्हणजे अखिल मानवजातीला स्वातंत्र्याचा लाभ'.''*
----------------------
*  लेनिन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel